मुंबई : माझा न्यायदेवतेवर विश्वास असून जनता गद्दारांना धडा शिकवेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. निवडणुका लवकर घेण्याची त्यांची हिंमत नसल्याचा टोलाही ठाकरे यांनी लगावला. राज्यातील सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सोमवारी अपेक्षित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही खरी शिवसेना कोणती हा वाद प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, न्यायालयात सोमवारी जे काही व्हायचे ते होईल. न्यायालयावर माझा विश्वास आहे. जनतेच्या सद्भावना आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे सगळी कामे पैशांनी होतात. पण माझ्याकडे रक्तामासांची, जिवाला जीव देणारी माणसे आहेत. माझ्याकडे निष्ठा दाखविणाऱ्या शपथपत्रांची खोकी येत आहेत. लोक निवडणुकीची वाट बघत आहेत. जनता गद्दारांना धडा शिकविल्याखेरीज राहणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या महाप्रबोधन यात्रेचा प्रारंभ ठाण्यातून मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून गणोशोत्सवानंतर राज्याचा दौरा करणार आहेत. त्यांच्या या यात्रेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यापासून होणार आहे. गणेशोत्सवानंतर ठाकरे यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने वातावरणनिर्मिती करण्यात येणार आहे. ठाण्यातील पहिली सभा ही आनंद दिघे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या टेंभी नाक्यावर होणार आहे. शिवसेना आणि ठाण्याचे वर्षांनुवर्षांचे समीकरण आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यातील बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली असली तरी जुन्या ठाण्यात अजूनही ठाकरे नावाचा दबदबा आहे. यातूनच ठाण्यातील टेंभी नाका येथे सभा घेऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान देणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्याची सांगता कोल्हापूरच्या बिंदू चौकातील सभेने होईल. दौऱ्याचे नियोजन अजून सुरू असून, लवकरच तारखा जाहीर केल्या जातील, असे सांगण्यात आले.