“तुम्हा सर्वांचे कष्ट, प्रयत्न, जिद्द यातूनच आपला पक्ष इथपर्यंत आला आहे, याची आम्हा सर्वांना जाणीव असून राष्ट्रवादी हा पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करायचा आहे. यासाठी एकसंघपणे प्रयत्न करूया.” असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन आज(शुक्रवार) साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे १० वाजून १० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. तर, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या एकजुटीने पक्षाला मिळालेल्या उभारीबद्दल जयंत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. “आपला पक्ष २३ वर्षांचा झाला आहे. आपल्या पक्षामध्ये महाराष्ट्रातील नव्या पिढीला भविष्यातील आशा दिसत आहे. अनेक तरूण पक्षात काम करण्यास इच्छुक आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम सुरु आहे, हे पक्ष वाढण्याचे एकमेव कारण आहे.” असेही जयंत पाटील म्हणाले. तसेच, २३ वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करताना राज्यात पक्षाच्या ताकदीवर आपली सत्ता स्थापन होईल, असा निर्धार केला होता याची आठवणही सांगितली. राज्यातील सर्व घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होईल, अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली. आरक्षणाला नख लावण्याचे काम काही शक्तींकडून होत आहे - छगन भुजबळ “पक्ष स्थापन झाल्यावर प्रांताध्यक्ष होण्याचा मान सर्वप्रथम मला मिळाला. राज्यात पक्षाची कोणतीही बांधणी नसताना काँग्रेस खालोखाल क्रमांक दोनचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरला. तेव्हापासून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण काम करत आहोत.” असे मंत्री छगन भुजबळ यांनी संबोधित करताना सांगितले. शरद पवारांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून राज्यात आरक्षण मिळवून दिले. या आरक्षणाला नख लावण्याचे काम काही शक्तींकडून होत आहे. मात्र त्याविरोधात आपण सक्षमपणाने लढा देतोय, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. याचबरोबर, देशात निरनिराळ्या प्रश्नांची माहिती असलेले व त्यांची सोडवणूक करण्याची ताकद असलेले नेते म्हणजे शरद पवार आहेत. आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल अधिक वेगाने करण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले. तर, आपल्याला पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडायची असल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार शेखर निकम, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी खासदार माजिद मेमन, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.