मुंबई : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाजवळ एअर इंडियाचे एक विमान कोसळून झालेल्या दुर्घटना अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे. अहमदाबादमधील विमान अपघाताचे वृत्त समजताच पश्चिम रेल्वेने दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. पश्चिम रेल्वेचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.
पश्चिम रेल्वेचे वैद्यकीय पथक आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेने अहमदाबादहून अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अहमदाबादहून मुंबईसाठी एक आणि दिल्लीसाठी एक रेल्वेगाडी चालवण्याचे नियोजन आहे.
साबरमती येथील विभागीय रेल्वे रुग्णालय, साबरमती कारखाना, वटवा आणि अहमदाबाद येथून ६ डॉक्टर, २० कर्मचारी आणि ७ रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. दुर्घटनाग्रस्तांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने डॉक्टर, कर्मचारी, रुग्णवाहिका रवाना करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेचे आरपीएफ आपत्ती व्यवस्थापन पथक आणि रुग्णालय पथक घटनास्थळी रवाना झाले आहे, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले.