अधिवेशनाचे सूप वाजल्यामुळे आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. बढतीविषयक समितीने मुंबईचे विद्यमान आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्यासह जावेद अहमद, के. पी. रघुवंशी यांना महासंचालकपदी बढती देण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे नवा आयुक्त कोण असणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. गृहखात्याने याबाबतच्या आपल्या शिफारशी पाठविल्या असल्या तरी शिक्कामोर्तब मुख्यमंत्री कार्यालयाकडून होणार आहे.
गृहरक्षक दलाच्या महासंचालक डॉ. श्रीदेवी गोयल सेवानिवृत्त झाल्यामुळे महासंचालकपदाचे एक पद रिक्त आहे. याशिवाय माजी पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांची केंद्रातील प्रतिनियुक्ती मान्य झाल्याने महासंचालकपदाचे आणखी एक पद रिक्त होणार आहे. पटनाईक यांचे पद रिक्त झाल्यानंतरच बढती प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासन विचार करीत आहे. त्यामुळे गोयल यांच्या रिक्त जागी डॉ. सिंग तर पटनाईक यांच्या जागी जावेद अहमद यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार ठाण्याचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांची नियुक्ती होऊ शकते. सप्टेंबर २०१३ मध्ये राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज खिलनानी सेवानिवृत्त होत असल्यामुळे रघुवंशी यांनी डॉ. सत्यपाल सिंग यांच्याप्रमाणे पाच महिन्यांचा कालावधी मिळू शकतो. केंद्र शासनाने राज्यात सहा महासंचालकपदांना मान्यता दिलेली असली तरी राज्यात पटनाईक यांच्यासाठी नवे महासंचालक पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे राज्यात चार महासंचालकांची पदे आहेत. त्यात आणखी वाढ केली तर रघुवंशी यांना बढती मिळून कांबळे यांच्या गळ्यात आयुक्तपदी माळ पडू शकते. २०१४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सेवाज्येष्ठता डावलून आयुक्तपदी नियुक्ती केली गेली तर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांचे नाव चर्चेत आहे. मात्र त्यासाठी तब्बल सहाजणांच्या सेवाज्येष्ठतेकडे शासनाला डोळेझाक करावी लागणार आहे.