मुंबई : सागरी किनारी रस्ता प्रकल्पाचे ५३ टक्के काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे १८० मीटरपेक्षा अधिक खणन काम पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२३ मध्ये बोगदा खणन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने निश्चित केले असून डिसेंबर २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे. या मार्गातर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटीदरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचे दोन बोगदे दोन्ही बाजूने बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी मरिन ड्राइव्हकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या पहिल्या बोगद्याचे खणन जानेवारीच्या २०२२ मध्ये पूर्ण झाले. दुसऱ्या बोगद्याचे काम एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू झाले होते. आतापर्यंत बोगदा खणन कामाचे १८० मीटरपेक्षा अधिकचे काम पूर्ण झाले आहे. बोगद्यांविषयी या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७० किलोमीटर एवढी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास हा १२.१९ मीटर आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असणार आहे. मावळा यंत्राचे धूड या बोगद्यांचे खोदकाम बोगदा खणणारे मावळा हे संयंत्र भारतातील सर्वात मोठय़ा व्यासाचे टीबीएम संयंत्र आहे. १२.१९ मीटर व्यास असणाऱ्या मावळा संयंत्राची उंची चारमजली इमारती एवढी आहे. तर त्याची लांबी ही तब्बल ८० मीटर एवढी आहे. त्याचे वजन सुमारे २८०० टन इतके असून त्याबरोबर वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीचे वजन सुमारे ६०० टन आहे. ‘मावळा’ संयंत्राची पाती दर मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरू शकणारी आहेत.