नागपुरात करोनाची स्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याने जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. महापौर संदीप जोशी तसंच आमदारांची मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्यासोबत आज महापालिकेत बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप जोशी यांनी शनिवार आणि रविवार असे दोन जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली. दोन आठवड्यांसाठी हा कर्फ्यू लागू असणार आहे. महिनाअखेरीस बैठकीदरम्यान कालावधी वाढवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

संदीप जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील पदाधिकारी, विरोक्षी पक्षनेते यांची आयुक्तांसोबतबैठक पार पडली. बैठकीत लॉकडाउनसंदर्भात चर्चा झाली. लोकप्रतिनिधींची लॉकडाउन संदर्भात मागणी होती. आयुक्तांचं मात्र मत वेगळं असून लॉकडाउन लावणं हिताचं नाही असं त्यांनी सांगितलं, लॉकडाउन लावल्यास अडचणी वाढतील असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंही लॉकडाउन लावण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे”.

“चर्चा करुन शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. येणारे पुढील दोन शनिवार-रविवार जनता कर्फ्यू कठोरपणे पाळण्याचा निर्णय झाला आहे. शनिवारी रात्री ते सोमवारी सकाळी साडे सात वाजेपर्यंत हा कर्फ्यू लागू असणार आहे. यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल,” असं संदीप जोशी यांनी सांगितलं.

दुसरीकडे करोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात किमान १४ दिवसांची टाळेबंदी आवश्यक आहे, असं मत शहरातील डॉक्टरांनी उच्च न्यायालयासमोर व्यक्त केलं आहे.