माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हंसराज अहीर अपघातातून बचावले असून सुखरुप आहेत. हंसराज अहीर बसलेल्या गाडीच्या मागे ही गाडी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हंसराज अहीर चंद्रपूरहून नागपूरला जात असताना वर्धा जिल्ह्यातील कांडळीजवळ सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हंसराज अहीर यांचे वाहन पुढे गेल्यावर मागचे वाहन कंटेनरला धडकले आणि हा अपघात झाला. अपघातात सीआरपीएफचा चालकही गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान जखमींना ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अपघातानंतर हंसराज अहीर स्वत: जखमींना घेऊन रुग्णालयात गेले होते.