शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी कनक रिसोर्सेस या कंपनीकडे देण्यात आल्यामुळे विविध वस्त्यांमध्ये जमा झालेला कचरा उचलण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे आहे. मात्र, अनेकदा तक्रारी करून कंपनीचे सफाई कर्मचारी पोहचत नसल्यामुळे नागरिकांची महापालिकेच्या विरोधात नाराजी वाढली होती. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘मोबाईल अॅप’ तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसात पदाधिकारी आणि प्रशासनाला त्याचा विसर पडला असून ही योजना केवळ सध्या कागदावर असल्याचे समोर आले आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार बघता घरोघरी आणि शहरातील विविध भागात, शासकीय व खासगी कार्यालयात, बाजारपेठेत जमा होणारा जवळपास ८०० ते ९०० टन कचरा बघता महापालिका प्रशासनाकडे मात्र त्याची विल्हेवाट लावण्याची पुरेशी व्यवस्था नाही. पूर्वी घरोघरी साचला जाणारा कचरा उचलण्यासाठी दिवसातून सकाळच्यावेळी एखादी गाडी येत असताना त्यात सफाई कामगार कचरा घेऊन जात असे. मात्र, कालांतराने शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढता परिसर बघता महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट २००९ मध्ये कनक र्सिोसेस कंपनीला दिले. कंपनीला शहरातून दररोज किमान ८०० टन कचरा उचलण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यासाठी प्रत्येक झोनमधे ४ गाडय़ांची कंपनीने व्यवस्था केली आहे. मात्र, त्या प्रमाणात कचरा उचलला जात नसल्यामुळे विविध वस्त्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. दररोज सकाळी विविध वस्त्यांमध्ये कचऱ्याची गाडी फिरणे आवश्यक असताना अनेक वस्त्यांमध्ये गाडी जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे घरोघरी जमा करण्यात आलेला कचरा दोन दोन दिवस पडलेला असतो. शिवाय विविध वस्त्यांमध्ये कचरा जमा करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या ठिकाणाहून तो उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शहरात कचरा असल्यास प्रत्येकवेळी पालिकेच्या कार्यालयात जाऊन तक्रार करणे नागरिकांना शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या मोबाईलद्वारे कचऱ्याचे छायाचित्र काढावे आणि ते महापालिकेच्या ‘मोबाईल अॅप’चा उपयोग करून नागरिकांनी तक्रार करावी, अशी ही संकल्पना होती. छायाचित्र अपलोड होताक्षणी कचरा असलेले ठिकाण कोणते, याचा जी आय मॅपिंगद्वारे शोध घेऊन समस्या मार्गी लावणार होती. माजी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे असताना अशा प्रकारचे एक ‘मोबाईल अॅप’ तयार करण्यात आले होते, परंतु जनजागृतीअभावी हा प्रयोग फसला होता. पुन्हा नवीन ‘मोबाईल अॅप’ तयार करण्याचा निर्णय तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी पाच महिन्यांपूर्वी घेतला होता आणि त्यासाठी एका खासगी कंपनीला त्याचे काम देण्यात आले होते. मात्र, अद्यापही हे ‘अॅप’ तयार करण्यात आले नाही. पदाधिकाऱ्यांकडे या संदर्भात चौकशी केली असता ते या विषयावर बोलत नाहीत. या संदर्भात आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, शहरातील कचरा उचलण्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे येत असतात. ‘मोबाईल अॅप’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर त्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे, पावसाळ्यापूर्वी ते सुरू होईल.