मानकापूर परिसरात सातत्याने भूस्खलनाचे प्रकार

मानकापूर-गोधनी परिसरात भूस्खलनाच्या आतापर्यंत चार घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी काल, गुरुवारी घडलेल्या घटनेत एका दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी मागवला आहे. त्यामुळे परिसरात भूस्खलन कशामुळे होत आहे, हे स्पष्ट होईल.

काल, गुरुवारी गोधनी मार्गावरील गायत्रीनगर परिसरात भूस्खलनाची घटना घडली. त्यात अंकुश सुधीर चौधरी या चिमुकल्याचा मृत्यू झाला. सुधीर यादवराव चौधरी हे मूळचे चंद्रपूरचे आहेत. परंतु, नोकरीनिमित्त गेल्या आठ वर्षांपासून ते नागपुरात वास्तव्यास आहेत. अडीच वर्षांपासून ते आपल्या कुटुंबासह गायत्रीनगर येथील राजेश कुंभारे यांच्या घरी भाडय़ाने राहत होते. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी मुलाला घेऊन विहिरीजवळ उभी होती. त्यावेळी अचानक भूस्खलन झाले आणि अख्खी विहीर जमिनीत गडप व्हायला लागली. त्यामुळे त्या मुलगा व मावशीसह जमिनीत शिरत होत्या. अचानक पडण्याचा आवाज झाल्याने पती सुधीर व सासरे यादवराव हे घरातून बाहेर आले व बघितले तर जमीनच आतमध्ये धसत होती. त्यामुळे त्यांनी पत्नी सुरेखा व मावशी मंदा यांना वाचविले. परंतु मुलगा हा आतमध्ये फसला. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेने मुलाला शोधण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. तब्बल तीन तास जेसीबीने माती खोदल्यानंतर मुलगा मृतावस्थेत सापडला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. त्यावेळी नागरिकांनी मानकापूर-गोधनी परिसरात भूस्खलन होण्याच्या घटना वारंवार घडतात. यंदा पावसाळ्यात चार घटना समोर आल्या. त्यापैकी एकाही घटनेत जीवितहानी झाली नव्हती. मात्र, चौधरी यांच्या घरी झालेल्या भूस्खलनात जीवितहानी झाली आणि प्रशासनाला विचार करायला लावले. दरम्यान जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी या प्रकरणाचा अहवाल संबंधित विभागाला सादर करण्यास सांगितले आहे.