महापौर संदीप जोशी यांची स्पष्टोक्ती; अतिक्रमण निर्मूलनाला प्राधान्य

शहराचा विकास साधताना थोडी कठोर भूमिका घ्यावीच लागणार आहे. यासाठी टीका होईल, पण त्याला मी घाबरणार नाही. कुणाचाही मुलाहीजा बाळगणार नाही, अशी स्पष्टोक्ती महापौर संदीप जोशी यांनी दिली. लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी शहर विकासाची ब्ल्यूप्रिन्ट लवकरच सादर करणार असल्याचेही सांगितले.

अतिक्रमण, अस्वच्छता हे शहराच्या विकासातील प्रमुख अडसर आहेत. सध्याच्या घटकेला आम्ही अतिक्रमणाचा प्रश्न अग्रक्रमावर हाती घेतला आहे. त्यासाठी नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विरोधी पक्षाचे गटनेते, तीन सहाय्यक आयुक्त, विविध अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या २० डिसेंबपर्यंत शहरातील अतिक्रमणबाबतचा अहवाल ही समिती सादर करेल. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान संपूर्ण शहरातून अतिक्रमण हटवण्याबाबत धडक मोहीम राबवली जाईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यात येईल. ते  पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली जाईल.  शहरातून कायद्याची भीती संपली आहे, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पण कायद्याची दहशत काय असते हे दाखवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कायदा तोडणाऱ्यांची  गय केली जाणार नाही, असे जोशी यांनी स्पष्ट केले.

शहराच्या विकासाकरिता स्वयंसेवींसह सर्वाकडून २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान सूचना मागवण्यात आल्या आहेत. याबाबत येत्या पाच डिसेंबरला भाजपा पदाधिकारी, सहा डिसेंबरला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच येत्या सात डिसेंबरला वाढत्या अतिक्रमणावर सभागृहाची बैठक आयोजित केली आहे, शहरातील वाहतूक व्यवस्था आणि वाहनतळाची समस्या सोडवण्याबाबत येत्या तीन डिसेंबरला पोलीस आयुक्तांच्या भेट घेणार आहे,असे ते म्हणाले.

रस्त्यांवर गाईम्हशींचे कळप ही मोठी समस्या आहे. आम्ही मतांसाठी ५० गवळ्यांचाच विचार करतो पण १५ ते २० लाख नागरिकाचा विचार करत नाही. मात्र, आता गोरेवाडय़ात नंदीग्राम बांधण्यात येत आहे.तेथे सर्व गोठे हलवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

महापालिकेत विविध खासगी कंपन्याच्या माध्यमातून मूलभूत सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली असली तरी त्याला पालिका प्रशासनही जबाबदार आहे. खासगी कंपन्याकडून कामे करून घेताना कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जोशी यांनी दिला.

पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे महिलांसाठी खुली करणार

शहराच्या कानाकोपऱ्यातून सीताबर्डी सारख्या भागात विविध कामानिमित्त लोक येतात, पण शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह सहज उपलब्ध नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे. याकडे लक्ष वेधले असता अशा परिस्थितीत शहरातील पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे महिलांसाठी उपयोगी ठरू शकतात. त्यादृष्टीने लवकरच या सर्व पेट्रोलपंप मालकांची बैठक घेऊन महिलांसाठी ही स्वच्छतागृहे खुली करण्याच्या सूचना त्यांना देण्यात येतील. महापौर निधी याच कामासाठी खर्च करण्यात येईल, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

कॅटरिंग व्यावसायिकांची नोंदणी

शहरातील कॅटरिंग व्यावसायिकांना आता महापालिकेत नोंदणी अनिवार्य आहे. यांनतर त्यांना या व्यवसायाकरिता परवाना देण्यात येईल. त्यात गुणवत्तेशी आमचा संबंध नाही, पण यांचे कुठेकुठे कार्यक्रम होतात आणि कुठेकुठे कचरा टाकतात, याच्याशी आमचा संबंध नक्की आहे. त्यामुळै शहराच्या स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

मुलीवर मान खाली घालण्याची  वेळ येणार नाही

महापौरांची मोहीम म्हणून मान खाली घालण्याची वेळ येऊ नये याची पूर्ण काळजी घेणार आहे. नाही तर घरी मुलगी म्हणेल, ‘बाबा तुम्ही पण इतरांसारखेच निघाले!’ हे होऊ द्यायचे नाही. त्यासाठी पूर्ण प्रयत्नांनिशी शहराची व्यवस्था योग्यरित्या सांभाळण्याचा प्रयत्न राहील.