जेएनयूमध्ये जर दहशतवाद्याचे समर्थन करीत देश तोडण्याची कोणी भाषा करीत असेल, तर त्याचे समर्थन करणे योग्य नाही. काँग्रेस देशद्रोही लोकांच्या पाठिशी राहत असताना त्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते संजय जोशी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कर्मचारी सहकारी प्रत्यय संस्थेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने भाजप नेते संजय जोशी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. जेएनयूमध्ये जे काही घडले ते देशाच्या दृष्टीने दुर्देवी असून त्याचे समर्थन करता येत नाही. काँग्रेससह इतर काही पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला असून ते त्याचे समर्थन करीत असतील तर या देशाचे दुर्देव आहे. त्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे.
या प्रकरणात काँग्रेससह कम्युनिस्ट पक्षाने राजकारण करू नये, असेही जोशी म्हणाले. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या प्रवेशाबाबत त्यांना विचारल्यावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.