संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांचा प्रश्न कायम

राज्यात वाघ वाढले आणि संरक्षित क्षेत्राबाहेर ते पोहोचले, पण या बाहेरील वाघांच्या संरक्षणाचा प्रश्न अजूनही कायमच आहे. त्यातही वाघाच्या जीवावर बेतणारी संकटस्थिती उद्भवलीच तर ती हाताळणारी परिपूर्ण यंत्रणा वनखात्याकडे उपलब्धच नाही. भ्रदावती तालुक्यातील सिरना नदीतील दगडाच्या कपारीत अडक लेल्या वाघाच्या मृत्यूने ही हतबलता आणखी ठळकपणे समोर आली आहे. विशेष म्हणजे, मानव-वन्यजीव संघर्षांत वन्यजीवप्रेमींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या परिसरातील नागरिकांनी वाघाच्या मृत्यूसाठी वनखात्याला दोषी ठरवले आहे.

चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र परिसरात आजमितीस तीन ते चार वाघांचा वावर आहे. केंद्राची पाईपलाईन पकडून तिकडच्या बाजूने आवंडा प्रवेशद्वाराकडून गेल्यास भ्रदावती लागून आहे. त्यामुळे याठिकाणी नेहमीच वाघ इकडून तिकडे जात असतात. काही दिवसांपूर्वी आष्टी येथे मृत्यू झालेला वाघही औष्णिक विद्युत केंद्र परिसरातीलच होता, हे स्पष्ट झाले होते. या परिसरात अनेकदा नागरिकांना विशेषत: वेकोलि कर्मचाऱ्यांना नेहमीच रस्त्यावर वाघाचे दर्शन होते. एका ठिकाणी तीन-तीन वाघ लोकांना दिसले आहेत. गुरुवारी मृत झालेला वाघ गेल्या दोन महिन्यापासून वेकोलि परिसरात फिरत होता. चार दिवसांपूर्वी नाल्यावर तो नागरिकांना दिसला होता. मात्र, त्याबाबत सांगूनही विभागाने काहीच कृती केली नाही, असा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे.

नदीत दगडांच्या कपारीत अडकलेल्या वाघाला वाचवता येऊ शकले असते, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. मात्र, त्यावेळी विभागाने अशी परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असणाऱ्या खात्यातील कर्मचारी, पशुवैद्यकांचा सल्ला मानण्याऐवजी स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर अधिक विश्वास दाखवला. त्यानुसारच बचावकार्याची सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी सुरू झालेले बचावकार्य सायंकाळी अंधार पडल्यानंतरही पूर्ण झाले नाही. परिणामी, सकाळपर्यंत वाघ तग धरू शकला नाही.

काही महिन्यांपूर्वी हळदा येथे अशाच गलथान व्यवस्थापनामुळे बिबटय़ाला प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणात वेकोलिने वनखात्याला संपूर्ण सहकार्य केले. अशावेळी स्वयंसेवकांच्या निर्देशावर चालण्याऐवजी अनुभवी कर्मचारी आणि पशुवैद्यकांची मदत घेतली असती तर कदाचित वाघाला वाचवता आले असते, अशाच प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.

प्रयत्न करूनही वाघाला वाचवता आले नाही, पण स्थानिक वन अधिकाऱ्यांवर आम्हाला पूर्ण भरवसा आहे. इतर लोक काय म्हणतात, यापेक्षा त्यावेळी त्यांना जो निर्णय योग्य वाटला तो त्यांनी घेतला. शेवटी प्रयत्नांचा भाग आहे. साधने, पद्धती यात कुठे कमी पडतो हे पाहावे लागेल. राहिला प्रश्न स्वयंसेवींच्या मदतीचा तर अधिकारी, कर्मचारी कितीही  प्रशिक्षित असले तरीही स्वयंसेवींची मदत ही घ्यावीच लागते. – नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)