गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून जवळपास २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील अबुझमाड येथे बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत २४ नक्षलवादी ठार झाले. चकमकीत एक जवान देखील शहीद झाला. ठार झालेल्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या काही मोठ्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. अद्याप चकमक सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील (ट्राय जंक्शन) अबुझमाडच्या जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आले होते. यात विविध राज्यात पाच कोटीहून अधिक बक्षीस असलेला नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस व ‘पॉलिट ब्युरो’ सदस्य बसवा राजू देखील असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर या पारिसरात २० मे रोजी रात्रीच्या सुमारास दंतेवावाडा, बीजापूर, नारायणपूर आणि कोंडागांव जिल्ह्यातील ५०० हून अधिक ‘डीआरजी’ व इतर सुरक्षा जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवले. दरम्यान, २१ मे रोजी सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात २४ नक्षलवादी ठार झाले. तर एक जवान शहीद झाला.

चकमक स्थळावरून नक्षलवाद्यांचे शव व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य, हत्यार जप्त करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप चकमक सुरूच असून नक्षल नेता बसवा राजूला जवानांनी घेरले आहे. मृतांमध्ये मोठ्या नक्षल नेत्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात दिवसांपूर्वी ३१ नक्षल्यांचा खात्मा

तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर सुरक्षा यंत्रनेणे नक्षलवाद्यांविरोधात सर्वात मोठे अभियान राबवले होते. तब्बल २३ दिवस चाललेल्या या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. यात कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा नेतृत्व करीत असलेल्या सर्वात आक्रमक बटालियन क्रमांक १ चे जवळपास ७०० हून अधिक नक्षलवादी छत्तीसगड-तेलंगणा सिमवेरील करेगुट्टा टेकडीवर एकत्र आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यावरून केंद्र आणि राज्य सुरक्षा दलातील तब्बल १० हजारहून अधिक जवानांनी या परिसरात नक्षलविरोधी मोहीम उघडली. याला ‘ऑपरेशन संकल्प’ असे नाव देण्यात आले आहे. यादरम्यान नक्षलवाद्यांनी पत्रक काढून ही मोहीम थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, या टेकडीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याशिवाय ही मोहीम थांबविण्यात आली नाही. टेकडीवर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य,बंदूका,स्फोटके, ताब्यात घेण्यात आले होते. मोठी गुहाही सापडली होती.