अकोला : दाट जलकुंभीमुळे दम घोटलेल्या मोर्णा नदीने आता मोकळा श्वास घेतला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या मोर्णा नदी पात्रातील ४.३ कि.मी.चा परिसर स्वच्छ करून जलकुंभी मुक्त करण्यात आला. या भागातील जलकुंभी काढण्याचे कार्य महापालिका यंत्रणेने पूर्ण केल्याने नदी काठच्या नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला.
अकोला शहराच्या मध्यवर्ती भागातून मोर्णा नदी वाहते. या नदीचे पात्र दूषित होऊन मोठ्या प्रमाणात जलकुंभी वाढली होती. त्यामुळे नदी पात्रातील पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला. परिसरातील नागरिक त्रस्त झाले. मोर्णा नदीच्या पात्रात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जलकुंभी दरवर्षीच वाढत असते. मोर्णा नदीतील जलकुंभी काढण्याचे कार्य मनपा प्रशासनाद्वारे युद्ध स्तरावर सुरू करण्यात आले होते. मनपा क्षेत्रातील अकोली खुर्द ते गडंकी मार्गावरील रेल्वे पुलापर्यंत ४.३ कि.मी. जलकुंभी काढण्याचे कार्य पूर्ण झाले आहे.
मागील वर्षाप्रमाणे मनपाने स्वबळावर नदीतील जलकुंभी काढण्याच्या कामाला २७ मार्चपासून पोकलेन यंत्र आणि मजूर लावून सुरुवात केली होती. जलकुंभी काढण्याचे तसेच नाले सफाईचे काम हे जलदगतीने होण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आदेश दिले. जलकुंभी काढण्यासाठी विशेष यंत्र खरेदी करून ते पोकलेनला लावण्यात आले. यामुळे जलकुंभी काढण्याचे काम हे चार ते पाच पटीने वाढले. हे काम अत्यंत कमी खर्चात पूर्ण झाले. ११ मेपर्यंत अकोली खुर्द ते गडंकी मार्गावरील रेल्वे पुलापर्यंत एकूण ४.३ किलोमीटर जलकुंभी संपूर्णत: काढण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या मार्गदर्शन व जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा यांच्या देखरेखीत हे कार्य करण्यात आले. महापालिकेच्या यंत्रणेने सलग दीड महिना कार्य करून नदी पात्रातील जलकुंभी हद्दपार केली आहे.
धरणातून पाणी सोडल्याने पातळी वाढली
देखभाल व दुरूस्ती आणि जनावरांच्या पिण्यासाठी दगडपारवा धरणामधून मोर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मोर्णा नदीत शहराच्या हद्दी बाहेरची जलकुंभी काही प्रमाणात वाहून आल्याचे दिसून येत आहे. ही जलकुंभी पाण्याची पातळी कमी झाल्यावर काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा यांनी दिली.