पिंपरी चिचवडला होऊ घातलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आज सायंकाळी सहा वाजता संपणार असून, उद्या दुपारी अध्यक्षपदाचा निर्णय होणार असल्याने साहित्य वर्तुळाचे लक्ष प्रत्यक्ष मतमोजणीकडे लागले आहे. संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महामंडळाच्या घटक संस्थांपैकी एक असलेल्या विदर्भ साहित्य संघाने घोषित केलेल्या मतदार यादीतील ८० टक्के मतदारांनी मतपत्रिका पाठवून उत्साह दाखवल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणुकीसाठी एकूण १०७० मतदार असून, या सर्व मतदारांना मतपत्रिका रवाना करण्यात आल्या होत्या. मात्र, अखिल भारतीय स्तरावरील मतदारांमधील अनुत्साहापेक्षा नागपुरातील मतदारांनी उत्साहाने मतपत्रिका पाठवल्या आहेत. उद्या, शुक्रवारी दुपारनंतर निकाल जाहीर होऊन नव्या संमेलनाध्यक्षाचे नाव समोर येईल. यावर्षी अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, प्रकाशक अरुण जाखडे, श्रीनिवास वारुंजीकर, श्रीपाद सबनीस आणि शरदकुमार लिंबाळे हे पाच उमेदवार रिंगणात आहेत. या पाचपैकी किमान चार उमेदवारांचे समर्थक नागपुरात असून त्यांनी आपापल्या पद्धतीने प्रचार केला आहे. पाचपैकी शरदकुमार लिंबाळे वगळता अन्य चार उमेदवार नागपुरात येऊन गेले. विठ्ठल वाघ यांनी विदर्भ साहित्य संघात अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी अनेक ज्येष्ठ साहित्यिकांच्या आणि मतदारांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. विठ्ठल वाघ मूळ वैदर्भीय असले तरी सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे. अरुण जाखडे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात आले होते मात्र ते फारसे कोणालाही भेटले नाही.
श्रीकांत वारुंजीकर चार दिवसांपूर्वी नागपुरात आले असता त्यांनी विदर्भ साहित्य संघास भेट देऊन काही स्थानिक मतदारांशी संपर्क केला. प्रसारमाध्यमाशी संवाद साधून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. श्रीपाद सबनीसही विदर्भात आले आणि त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या. पाचवे उमेदवार शरदकुमार लिंबाळे यांनी मात्र विदर्भाकडे पाठ फिरविली. आपापल्या परीने सर्वानीच उमेदवारांचा प्रचार केला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या यादीत एकूण १७५ मतदारांची यादी असून, अनेकांना मतत्रिका पोहचल्यानंतर त्यातील निवर्तलेले मतदार वगळता ८० टक्के मतदारांनी मतपत्रिका पाठवल्या आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महामंडळाला एकूण १४५ च्यावर मतपत्रिका पाठवल्या गेल्या आहेत. त्यातील काहींनी विदर्भ साहित्य संघामार्फत पाठवल्या तर काहींनी थेट महामंडळाच्या कार्यालयात पाठवल्या आहे. अनेक मतदारांना मतपत्रिका मिळाल्या नसल्यामुळे त्यांनी महामंडळाकडे संपर्क केला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्या पोहचू शकल्या नसल्याचे बोलले जात असले तरी बहुतेकांनी संस्थेमार्फतच मतपत्रिका पाठवल्या, हे खरे. घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघातून ८० टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली असून, त्यापैकी कोणाच्या पारडय़ात किती मतदान झाले आहे सांगणे कठीण आहे. असे असले तरी सध्या विठ्ठल वाघ यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात असले तरी कोणाला किती मते मिळतात आणि कोण विजयी होणार हे उद्या मतमोजणीनंतरच निश्चित होणार आहे.