अमरावती : नवीन तूर बाजारात यायच्या आधीच पश्चिम विदर्भातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांमध्‍ये तुरीचे भाव कमी झाले असून दर आठवडाभरात ९०० रुपयांनी घसरले आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्‍या ११ डिसेंबर रोजी अमरावती कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत तुरीला किमान ९ हजार २५० तर कमाल ९ हजार ८११ रुपये म्‍हणजे सरासरी ९ हजार ५३० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. बुधवारी १८ डिसेंबरला किमान ८ हजार ५०० रुपये आणि कमाल ८ हजार ८०० रुपये म्‍हणजे सरासरी ८ हजार ६५० रुपये इतका भाव मिळाला.

हेही वाचा – नितीन गडकरींना उच्च न्यायालयाकडून नोटीस, खासदारकी रद्द…

तुरीची आवक मुख्यतः जानेवारीपासून सुरु होते यंदाही याच काळात बाजारातील आवक जास्त राहू शकते, असा अंदाज आहे. सध्‍या नवीन तूर बाजारात येण्याच्या आधी साठवून ठेवलेली तूर बाजारात येत आहे. बाजारात आवक वाढल्‍यानंतर भाव कमी होतात.

विदर्भात मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते. मात्र, गेल्‍या वर्षी झालेल्‍या अवकाळी पावसामुळे तुरीच्‍या उत्‍पादनात मोठी घट झाली होती. त्‍यामुळे बाजारात तुरीची आवक मंदावली होती. आवक घटली असताना बाजारातून मागणी वाढल्‍याने तूर डाळीचे भाव गगनाला भिडले होते.

यावर्षी फेब्रुवारी महिन्‍यात तुरीच्‍या भावाने १० हजारांचा टप्‍पा ओलांडला होता. पण, आता तुरीचे भाव झपाट्याने खाली येत आहेत. सरकारने यंदा तुरीला ७ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. सध्‍या बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर असले, तरी नवीन तूर बाजारात आल्‍यावर दरांमध्‍ये आणखी घसरण होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

तूरडाळीच्‍या दरांमध्‍येही घसरण

सहा महिन्‍यांनंतर तूरडाळीच्‍या दरात घसरण सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ १७० रुपये किलोपर्यंत तर मूगडाळ आणि इतर डाळीही शंभरीपार गेल्‍याने सर्वसामान्‍यांच्‍या जेवणातून डाळ कमी झाली होती. आता मात्र तूरडाळीचे दर घसरले आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळरचे दर २० रुपयांनी कमी झाल्‍याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – Video: “अजितदादा, तुम्ही नक्की एक दिवस…”, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मिश्किल टिप्पणी, सभागृहात पिकला हशा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारच्‍या चुकीच्‍या आयात-निर्यात धोरणाचा फटका हा शेतकऱ्यांना सातत्‍याने बसत आला आहे. जेव्‍हा बाजारात शेतमालाची आवक कमी होते, तेव्‍हा दर वाढण्‍याची अपेक्षा असताना आयात केली जाते आणि दर पाडले जातात. हे दुष्चक्र थांबायला हवे, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेचे नेते जगदीश बोंडे यांनी व्‍यक्‍त केली आहे.