विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना वेगळं विदर्भ राज्य तयार करायचं होतं. त्यासाठी त्यांनी साडेचार वर्ष मुख्यमंत्री राहून नंतर शेवटच्या सहा महिन्यांमध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव मांडण्याचा विचार केला होता असं अजित पवार म्हणाले. "देवेंद्रजी तुम्ही नाहीच म्हणणार पण तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला तेव्हा वेगळ्या विदर्भाबद्दल आणेसाहेबांनी एक सांगितलं होतं. तेच आणेसाहेब त्यांना तुम्ही एजी केलेलं होतं. तुम्ही कितीही नाही म्हणाला तरी मी खात्रीनं सांगतो की त्यावेळेस तुमच्याही मनामध्ये असं होतं की मुख्यमंत्री झाल्या झाल्या साडेचार वर्ष राज्याचं मुख्यमंत्री रहायचं आणि शेवटच्या सहा महिन्यात वेगळ्या विदर्भाचा ठराव करायचा," असं अजित पवार म्हणाले. "तेलंगणमध्ये झालं तसं वेगळ्या विदर्भाचा ठराव करुन मराठी भाषिक दोन राज्यं करायची, भावना तुमच्या मनात होती," असं अजित पवार म्हणाले. "त्यामध्ये राज्याचं मुख्यमंत्री कोणीही झालं तर मग ते देवेंद्रजी असो किंवा विदर्भातील कोणी असो. दुर्देव आहे की उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मुख्यमंत्रीपद मिळालं. पण उत्तर महाराष्ट्राला धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. "आपण एकत्र ठराव केला आहे. आपण एकत्र राहुयात. जिथं कुठं काही कमतरता असेल ती भरुन काढूयात अध्यक्ष मोहोदय आपण पण विदर्भाचं प्रतिनिधित्व करता. विदर्भामध्ये वेगवेगळे उद्योग आहेत. आपल्या पिकांवर प्रक्रिया करणारी कारखानदारी आली पाहिजे," असं अजित पवार म्हणाले. "बऱ्याचदा तुम्ही बोलताना साखर कारखान्यांबद्दल निघालं की तुम्ही त्यासंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीची विधानं करता. तो तुमचा अधिकार आहे. पण कारखान्यांमुळे खरोखरच महाराष्ट्रात सुबतता आली. तुम्ही काही बाबतीत म्हणता मुद्दाम कारखान्यांच्या किंमती कमी करता असं काहीही झालेलं नाही," असं अजित पवारांनी सांगितलं. तसेच पुढे अजित पवारांनी, "विदर्भातील कारखाने गेले. आजही मी सांगतो न्यायालयाने साखर कारखाने विकायची निर्देश दिले तर विदर्भातील कारखाने ११ कोटी, १२ कोटी, १५ कोटी, १६ कोटीला कोण घेत नाही. कारखाना चालवणा येड्या गबाळ्याचं काम नाही," असं म्हटलं. "सुतगिरणी असो, बँक असो तुम्ही का आत्मपरिक्षण करत नाही की महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये दूध वाढलं आपल्या विदर्भात का नाही वाढलं? बाहेरचे लोक येऊन दूध काढत नाही की इथल्या म्हशी गायी दूध देत नाही? काय होतंय काय?" असा प्रश्न अजित पवारांनी विदर्भातील नेत्यांना विचारला. "रेशम उद्योग, शेळी पालन उद्योग कोणी आडवला? एवढा कापूस पिकतो का नाही चालला सूतगिरी उद्योग? गडकरी साहेबांनी प्रयत्न करुन दोन ते तीन ते कारखाने चालवले. ते लढतायत त्यातून ऊस वाढतोय. माझं म्हणणं आहे की, इच्छाशक्ती दाखवा ना राजकीय. उगाच हे पश्चिम महाराष्ट्राचे काही करत नाही. आमच्यावर अन्याय करतात. अरे आपल्या पण मनगटातील ताकद दाखवा ना," असं थेट आव्हानच अजित पवारांनी दिलं. "जिल्हा बँका कोणी बंद पाडल्या? बाहेरच्या लोकांनी बंद पाडल्या का? कोण जबाबदार आहेत? ११ जिल्हे आहेत. फक्त वाशिम अकोला एकच बँक आहे. बाकीच्या मला वाटतं १० बँका आहेत. बँका जे ताकदीने चालवत असतील ते कुठल्या गटाचे, पक्षाचे, तटाचे पाहू नका. त्यांना सपोर्ट करा. जे चुकीचं चालवत असतील ते दुरुस्त करा. चुकीची प्रवृत्ती वाढणार नाही असं काम आपण सावेसाहेब करा," असं अजित पवार सहकामंत्री अतुल सावेंकडे पाहून म्हणाले.