अकोला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे बोट समुद्रात उलटून झालेल्या अपघातात अकोल्यातील युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. आकाश देशमुख (३०, रा. शास्त्री नगर, अकोला) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेचे वृत्त कळताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या भागात शोककळा पसरली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे जय गजानन नावाची बोट पर्यटकांना घेवून जात असतांना दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास किनाऱ्यावर आणत असताना ती बुडाली. या बोटीत २० पर्यटक होते. त्यापैकी दोन पर्यटक मृत झाल्याची माहिती ग्रामीण रूग्णालय मालवण यांचेकडून प्राप्त झालेली आहे. उर्वरित १८ पर्यटक तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत. या दुर्घटनेत अकोल्यातील आकाश देशमुख या ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. आकाश देशमुख हा बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा भाचा होता.