आपल्या समाजावर पुराणकथांचा मोठा प्रभाव आहे. अनेक वडीलधारी माणसे घरात लहान मुलांना या कथा बळजबरीने का होईना ऐकवत असतात. या कथांमध्ये शिकार करणे हे शौर्याचे प्रतीक आहे, पुरुषार्थाचे लक्षण आहे, असे हमखास वर्णन असते. मुले मोठी झाली की त्यांना या कथा आठवत नाहीत, पण त्यातील सार मात्र अनेकांच्या लक्षात राहते. कदाचित, हेच सार काटोलचे भाजपचे आमदार आशीष देशमुख यांच्याही लक्षात राहिले असावे. म्हणून त्यांनी शौर्याचे प्रतीक आहे, या थाटात नीलगाईची शिकार केली व त्याची छायाचित्रे सर्वाना दिसतील अशी व्यवस्था केली. शौर्य किंवा पुरुषार्थ दाखवणे ही लपवून ठेवण्यासारखी गोष्ट नाही. कारण, याचा संबंध कर्तबगारीशी असतो. तीच लपवली तर कर्तृत्व कसे दिसेल? त्यामुळे काटोलच्या जंगलात जे काही घडले, त्याला देशमुखांना दोषी ठरवता येणार नाही. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार काहीही म्हणोत. शेवटी, पदावर बसले असल्याने सल्ले देणे त्यांचे कामच आहे, पण देशमुखांनी बंदूक हाती धरून, शिकाऱ्याची साथसंगत करून काहीही चूक केली नाही. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणारी ती नीलगाय, तिला मारणार नाही तर काय जिवंत ठेवणार?, हा देशमुखांचा सवाल रास्त आहे.
सध्या साऱ्या देशात शेतकऱ्यांची अवस्था हा कळीचा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे राज्यकर्ते असोत वा नेते, या सर्वामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. या स्पध्रेत आमदार म्हणून देशमुखांनी उडी घेतली तर बिघडले काय? त्यांनी का म्हणून मागे राहायचे? पिकांना भाव नाही, निसर्ग बेताल झाला आहे, अशा स्थितीत हातचे पीक ही लेकाची नीलगाय फस्त करत असेल तर तिला मारायलाच हवे. शेतकऱ्यांच्या मदतीला रात्रीच्या अंधारात बंदूकधारी सोबत घेऊन धावून जाणारे देशमुखांसारखे कर्तव्यदक्ष आमदार निसर्गावर गोळी झाडू शकत नाहीत, ज्या व्यवस्थेमुळे शेतकरी नाडवला गेला त्या व्यवस्थेचाच ते एक भाग असल्यामुळे गोळी झाडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग अशावेळी पिकांचे नुकसान करणारी मुकी व बिचारी नीलगाय समोर दिसली तर गोळी झाडावीच लागणार ना! तसेही शिकार नेहमी दुबळ्याचीच केली जाते. सर्वात शक्तीमान मानव हा तर्क गृहीत धरला तर नीलगाय फारच दुबळी ठरते. तिला शेतकरी ओळखता येत नाही, आपण पीक नष्ट करतो म्हणजे एका कुटुंबाचा घास हिरावतो, हेही तिला समजत नाही. असे काहीच न समजणाऱ्या प्राण्याला जिवंत राहण्याचा अधिकारच काय? जंगल हेच आपले कार्यक्षेत्र आहे, ते सोडून बाहेर येण्याची हिंमत दाखवणाऱ्या गाईला जिवंत सोडायचे म्हणजे खूपच झाले! म्हणूनच देशमुखांचे काहीच चुकले नाह,ी असे सर्वाचेच स्पष्ट मत झाले आहे.
देशमुखांना बंदूकधारी नेमण्याचा अधिकार कुणी दिला, असा बावळट प्रश्न काहीजण विचारत आहेत. आता शेतकरी बंदूकधारी कुठून आणणार? त्याला मदत करण्यासाठी बंदूकधारी देणे हे आमदारांचे कर्तव्यच ठरते. जस जसे दिवस बदलत आहेत तस तसे आमदारांसमोर येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप सुध्दा बदलत आहे, हे या बावळटांना कोण सांगणार? शेतकऱ्यांचा कैवार घेतलेल्या कोणत्याही आमदाराला पीक महत्त्वाचे की प्राणी, असा प्रश्न विचारला तर तो पटकन पीक म्हणेल, अशी सध्याची स्थिती आहे. शेवटी पीक वाचले तर शेतकरी जगेल, तो जगला तर देश प्रगती करेल. प्राणी काय आज आहेत, उद्या नाहीत आणि त्यांची पैदास सतत होतच असते. एक मेला किंवा मारला गेला की, दुसरा तयार होतोच. त्यामुळे प्राण्यांना एवढी किंमत का द्यायची, हा तर्क लक्षात घेतला तर देशमुखांचे अजिबात चुकले नाही, याची खात्रीच पटते. राज्यात शिकारीवर बंदी आहे. देशमुखांची अशी छायाचित्रे प्रसारित झाल्याने शिकारीला प्रोत्साहन मिळेल, शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावावर इतर प्राणी मारले जातील, अशी भीती कायम वन्यप्राण्यांचा कैवार घेणारे काही प्रेमी आता उपस्थित करू लागले आहेत. नीलगाईला मारण्याचा कायदा झाला तेव्हा गोळी झाडण्याचे काम वनखातेच करेल, इतरांना परवानगी देऊ नका, असा आग्रह या प्रेमींनी सरकारकडे धरला होता म्हणे! आता देशमुखांची छायाचित्रे बाहेर आल्यापासून तर या प्रेमींना चक्क कंठ फुटला आहे. मात्र, देशमुखांनी या प्रेमींच्या कोल्हेकुईकडे दुर्लक्ष करणेच उत्तम! या प्राणीप्रेमींना माणसांचे महत्त्वच राहिले नाही. त्यांना माणसांपेक्षा प्राणी महत्त्वाचे वाटतात. शेतकऱ्याच्या दु:खाशी त्यांना काही घेणेदेणे नाही. जंगल राखा, वन्यप्राणी जगवा, असाच त्यांचा घोषा असतो. माणसे मेली तरी चालतील, याच पवित्र्यात ते कायम असतात. वास्तवाचे भान नसलेले हे प्रेमी आहेत. त्यांच्याकडे देशमुखांनी लक्ष देऊ नये. शेवटी चांगल्या हेतूने एखादी कृती करणे महत्त्वाचे. मग ती शिकार असली तरी चालेल.
खरे तर, या छायाचित्रावरून एवढा गदारोळ उठल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी मी एकदा नाही दहादा बंदूकधारीची सोबत करेन, असा दमदार पवित्रा देशमुखांनी घ्यायला हवा होता. या प्रेमींना नसेल, पण आमदाराने वास्तवाचे भान ठेवायलाच हवे ना! काहीही असो, या प्रकरणाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मध्यरात्री बंदूकधारी सोबत घेऊन जाणारे आमदार, असे नवे बिरूद देशमुखांच्या मागे चिकटले, हे मात्र खरे! अशी तत्परता दाखवणाऱ्या आमदाराची माध्यमांनी बदनामी करावी, हे अतीच झाले. त्यामुळेच आता बेकायदेशीर काहीही नसलेले हे प्रयोग देशमुखांनी बिनधास्त करावेत.
मात्र, ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाने सध्या गाईला कवटाळले आहे. हा पक्ष सध्या गाईचे पावित्र्य सांगण्यात व्यस्त आहे. तेव्हा गाय आणि नीलगाईत नेमका काय फरक आहे, हे एकदा त्यांनी रेशीमबागेत जाऊन समजून घ्यावे. अन्यथा, परिवारात नवे असलेल्या या युवा नेत्याची भलतीच अडचण होईल. बाकी देशमुखांची ही कामगिरी मात्र झकास होती. त्यामुळे पुन्हा ठो.. ठो.. ऐकायला साऱ्यांचे कान आतूर झाले आहेत.

– देवेंद्र गावंडे