बुलढाणा : जिल्ह्यातील हमी केंद्रावरील शेतमालाची खरेदी हजरो शेतकऱ्यांसाठी अडचणीची आणि संतापाची बाब ठरली. याचा उद्रेक आज चिखली तालुक्यातील सोमठाणा हमी केंद्रावर झाला. तीन दिवसापासून सोयाबीन खरेदी राखडलेल्या एका शेतकऱ्याने केंद्रावरच अंगावर पेट्रोल ओतून घेतले! तो जीवाचे काही बरेवाईट करून घेईल त्यापूर्वी सोबतच्या शेतकऱ्यांनी त्याला वेळीच रोखल्याने सांभाव्य भीषण अनर्थ टळला. ज्ञानेश्वर दिनकर सावळे (राहणार डोंगरशेवली तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा ) असे संतप्त आणि अडवणुकीमुळे जीवावर उदार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

हमीभाव केंद्रावर तीन दिवसांपासून सोयाबीन पडून होती, सोयाबीन खरेदीसाठी विलंब लागत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. हमीभाव केंद्रावर उपस्थित इतर सहकारी शेतकऱ्यांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील अहिल्याबाई सहकारी संस्थेच्या हमीभाव केंद्रावर हा प्रकार आज, ४ जानेवारीला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडला.

हेही वाचा – VIDEO : कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता, शिक्षा मात्र…

काय झालं नेमकं?

प्राप्त माहितीनुसार बारदाना उपलब्ध नसल्याने हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रखडली होती. डोंगरशेवली येथील शेतकरी ज्ञानेश्वर दिनकर सावळे यांनी त्यांच्या शेतातील अंदाजे ५० क्विंटल सोयाबीन सोमठाणा येथील ‘आम्ही भाऊ केंद्रा’वर आणली होती. मात्र गेल्या ३ दिवसांपासून सोयाबीन गाडीत तशीच पडून होती. सोयाबीन खरेदी होत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा अखेर धीर सुटला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब सोबतच्या सहकारी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी ज्ञानेश्वर सावळे यांना रोखले यामुळे पुढील अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. शेतकरी नेते विनायक सरनाईक हेदेखील घटनास्थळी पोहोचले होते. वृत्त लिहिस्तोवर पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचा – निवडणुकीनंतर ग्राहकांवर स्मार्ट वीज मीटर लादले, शासनाची ही घोषणा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी मेलो तरी बेहत्तर…

मी मेलो तरी चालेल पण बाकीच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे असे म्हणत ज्ञानेश्वर सावळे यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. आमच्या मालाची यांना किंमत नाही, किती दिवस संयम ठेवायचा? आता संयम सुटला आहे, असेही ज्ञानेश्वर सावळे यांनी म्हटले आहे.