वाशीम : जिल्ह्यातील मानोरा आणि वाशीम या दोन बाजार समित्यांची निवडणूक पार पडल्यानंतर आज ३० एप्रिल रोजी रिसोडमध्ये ६६, कारंजा ५९, मंगरुळपीर ७० तर मालेगावमध्ये ५० टक्केच्यावर विक्रमी मतदान झाले. सकाळपासूनच जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत असल्याने वेगाने मतदान होत आहे.

चारही बाजार समितीच्या प्रत्येकी १८ जागांसाठी १८३ उमेदवार निवणुकीच्या रिंगणात असून ८ हजार ८९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कारंजा बाजार समितीच्या १८ जागांसाठी ७० उमेदवार असून २ हजार ३२० मतदार आहेत. रिसोड बाजार समितीत १८ जागांसाठी ३९ उमेदवार असून २ हजार ४७३ मतदार आहेत. मालेगाव बाजार समितीत १८ जागांसाठी ३७ उमेदवार असून २ हजार ५८९ मतदार आहेत. मंगरूळपीर बाजार समितीत १८ जागांसाठी ३६ उमेदवार असून १ हजार ८७६ मतदार आहेत.

हेही वाचा – यवतमाळसह दारव्हा, दिग्रस आदी भागात गारपीट; जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिसोड बाजार समितीच्या निवणुकीत नुकतेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी खासदार अनंतराव देशमुख व काँग्रेसचे आमदार अमित झनक पुरस्कृत पॅनलमध्ये लढत होत आहे. तर कारंजा बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते स्व. प्रकाश डहाके यांच्या पत्नी व भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी तर मंगरूळपीरमध्ये माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे तर मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार अमित झनक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वाशीम व मानोरा बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. उर्वरित चार बाजार समितीच्या निवडणुकीत कुणाचे पानिपत होते व कोणत्या आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित होते, हे आजच सायंकाळनंतर स्पष्ट होणार आहे.