मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक जण मुंबईकर असून मुंबईला किंवा महाराष्ट्राला घडविण्यामध्ये सगळ्यांचे योगदान आहे, अशी भूमिका राज्यपालांनी मांडली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या वक्तव्याकडे त्याच दृष्टीने बघितले पाहिजे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यपालांचा बचाव केला.

चित्रा वाघ नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण महाराष्ट्रीयनच आहे. त्यामुळे सगळे जण मराठी म्हणूनच वावरतात. मुंबईत राहणारा प्रत्येक जण मुंबईकरच आहे. त्यामुळे राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याकडे त्या दृष्टीने बघितले पाहिजे. विरोधकांकडे आता काही दुसऱ्या गोष्टी राहिलेल्या नाही त्यामुळे अशा गोष्टींवरती ते बोलत राहतात. सध्या त्यांच्याकडे काही सेकंदात ७० शिव्या देणारे सर्वज्ञानी आहेत आणि ते अशा पद्धतीने राजकारण करत राहतात, असेही वाघ म्हणाल्या.

उमरेडमध्ये अकरा वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार झाला ही घटना दुर्दैवी आहे. त्या घटनेची माहिती घेण्यासाठी उमरेडला जात आहे. उमरेड पोलिसांचे कौतुक करायला पाहिजे. त्यांनी सुमोटो केस दाखल केली असून त्यात ९ आरोपींना अटक केली. मी त्या परिवाराला आज भेटायला जात आहे. भाजपकडून त्यांना आर्थिक मदत केली जात आहे. मात्र अशा प्रकारे घडत असलेल्या घटना समाजासाठी लाजिरवण्या आहेत. यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. शिंदे व फडणवीस सरकार आले आहे. ते प्रभावी कायदे करण्याची भूमिका आम्ही घेत आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.