सी.मो. झाडे फाउंडेशनद्वारे संचालित सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे दिला जाणारा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार डॉ. स्मिता व डॉ. रवींद्र कोल्हे या दाम्प्त्याला प्रदान करण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एक लक्ष रुपयांचा धनादेश, मानपत्र आणि शाल देऊन दोघांचा सत्कार करण्यात आला.
साई सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार कृपाल तुमाने, सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. रूपा कुळकर्णी, मा.म. गडकरी आदी होते. डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सतत अडचणीत मदत करणारे गिरीश गांधी तसेच नितीन गडकरी यांच्या आठवणी सांगतानाच अद्यापही २५० गावांमध्ये वीज व मोबाईल टॉवर नसल्याने येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. डॉ. स्मिता कोल्हे यांनी स्त्री डॉक्टर होऊ शकत नाही, ही मानसिकता असलेल्या आदिवासी भागात त्यांचा डॉक्टर होण्याचा प्रवास काही उदाहरणे देऊन उलगडला. बैरागडला जाऊन आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करण्याचे व्रत स्वीकारले. त्यासाठी पुढील जन्म मिळाला तरी आनंदाने रवींद्र यांच्याबरोबर काम करेल, असा दुर्दम्य विश्वास व्यक्त करून त्या भागात वृद्धाश्रम नाही, अनाथालय नाही कारण जवळची अर्धी चपाती देणाऱ्या आदिवासी संस्कृतीत अद्यापही कन्या भ्रूण हत्या किंवा वृद्धाश्रम जोपासणारी शहरी विकृती आलेली नसल्याचे प्रतिपादन केले. सुधीर मुनगंटीवार यांनी दारू बंदी नव्हे तर दारूमुक्ती करायची असे सांगून चंद्रपूरची दारू बंदी करताना मला राजकारणातून संपवण्याचा, नक्षलवादी हल्ले करण्याचे कट कारस्थान करण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली.
नितीन गडकरी यांनी सदैव चांगल्या कामासाठी संवेदनशील मन ठेवून मदत करणाऱ्या गिरीश गांधी यांचे ६८व्या वाढदिवसाबद्दल अभीष्टचिंतन केले. आदिवासी भागात आसमानी नव्हे तर सुलतानी संकट आहे. प्रशासन आदिवासींचा विकास होऊ देत नाही. १९९७ मध्ये बैरागडपर्यंत रस्ते घेऊन जाताना आलेल्या अडचणी आणि त्यातून काढलेले मार्ग याचे वर्णन त्यांनी केले. तसेच आदिवासी भागात उपयोगी पडणाऱ्या अनेक योजनांचा ऊहापोह करताना गडचिरोली भागातील कोसाच्या साडय़ा सुश्मिता सेन, प्रिटी झिंटा, हेमामालिनी यांना भेट म्हणून दिल्या तसेच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनही त्या उपयोगात आणत असल्याचे सांगून आदिवासी भागात कला आहे पण विपणन नाही. त्याठिकाणी रोजगार निर्माण झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याच्या गरजेवर भर दिला.
प्रास्ताविकात व्यसन मुक्तीचे व्रत हाती घेतल्यानंतर येणाऱ्या अडचणींविषयी संस्थेचे अध्यक्ष विकास झाडे म्हणाले, व्यसनाचे दुष्परिणाम भयानक असून हे चिलिंग, गांजा पिणाऱ्या बाबांनाच केंद्रात आणून त्यांचे व्यसन सोडवणार आहे. जेणे करून त्यांच्यामुळे पिणारे इतर भक्त तरी व्यसन मुक्त होतील. प्रेक्षकांमध्ये सत्यनारायण नुवाल, भारती झाडे, गिरीश गांधी आणि विभा गांधी आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr kolhe couple get dr girish gandhi national social work award
First published on: 24-07-2016 at 02:31 IST