चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वदूर पूर आल्याने जिल्ह्यातील २० मार्ग बंद आहेत. यामुळे वाहतूक खोळंबली आहे. वर्धा व इरई नदीला पूर आल्याने अनेक अंतर्गत मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागांत अजूनही पाऊस सुरू आहे. चंद्रपूर शहर तथा जिल्ह्यात नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. हेही वाचा - व्याजासह कर्जाची रक्कम परत केल्यावरही सावकार महिलेकडून छळ… अखेर आयुष्यच संपवले! हेही वाचा - ‘नियम तोडण्यात तुम्ही आघाडीवर आणि मला नियम…. नितीन गडकरींनी सांगितला पंतप्रधानांचा किस्सा वर्धा व इरई नदीला पूर आला आहे. इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले आहे. त्याचा परिणाम सर्वदूर पाणीच पाणी असून जिल्ह्यातील २० मार्ग पुरामुळे बंद झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने राजुरा -बल्लारपूर, राजूरा - सास्ती, धानोरा - भोयगाव, गौवरी कॉलनी - पोवणी, तोहोगाव - लाठी, कोरपना - कोडशी, रूपापेठ - मांडवा, जांभूळधरा - उमरहिरा, पिपरी - शेरज, पारडी - रुपापेठ, कोडशी - पिपरी, कोरपना - हातलोणी, कुसळ - कातलाबोडी - कोरपना, शेरज - हेटी, वनसडी - भोयगाव, विरूर स्टेशन - वरूर रोड, विरूर स्टेशन - सिंधी, विरूर स्टेशन - लाठी, धानोरा - सिंधी हे मार्ग पुरामुळे बंद झाले आहेत. अशीच अवस्था राहिली तर जिल्ह्यातील लहान मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. पुरात कार वाहून गेली गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर (पोंभुर्णा मार्गावर) जवळील पुलावरून पुरवठा अधिकारी गेडाम यांची कार वाहून गेली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.