देवेश गोंडाणे नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० च्या अंतिम निकालाची अंतिम गुणवत्ता यादी मंगळवारी (३१ मे) जाहीर करण्यात आली. यात भंडारा जिल्ह्याच्या भिलेवाडातील शेतकरी कुटुंबातील स्नेहल रामटेके या विद्यार्थ्यांने घवघवीत यश प्राप्त केले. स्नेहलची उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाली आहे. स्नेहलचे वडील शेतकरी असून आई अंगणवाडीमध्ये मदतनीस आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मार्च २०२१ मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, अशा वर्ग १ च्या पदांसाठी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. २ हजार ८६३ उमेदवारांनी मुख्य परीक्षा दिली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या ५९७ उमेदवारांच्या १८ ते २९ एप्रिलदरम्यान मुलाखती घेऊन दोन तासात अंतिम निकालाची सर्वसाधारण यादी जाहीर करण्यात आली. त्यात प्रमोद चौगुले याने राज्यात प्रथम, तर रूपाली माने हिने महिलांमधून प्रथम क्रमांक पटकावला. ‘ऑिप्टग आऊट’च्या प्रक्रियेनंतर शिफारसपात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. स्नेहल रामटेकेने पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश मिळवले. स्नेहल बालपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. त्याने दहावी आणि बारावी परीक्षेतही गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले होते. २०१५ मध्ये बारावीच्या परीक्षेत तो भंडारा जिल्ह्यातून पहिला आला होतो. त्यानंतर त्याने ‘एमआयटी’मधून यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मात्र, अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही शासकीय सेवा करायची या भावनेने त्याला स्वस्थ बसू दिले नाही. स्नेहलने एमपीएससी परीक्षेचा निर्णय घेतला. २०१९ पासून या परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला. एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांने ‘एमपीएससी’सारखी कठीण परीक्षा पाहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्नेहलचे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायची आहे, असे स्नेहलने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.