अमरावती : अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी चढवलेल्या हल्ल्यात ३० ते ४० जण जखमी झाले आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा शंभू या गावात शनिवारी दुपारी घडली. मधमाशांच्या हल्ल्यानंतर नागरिकांची चांगलीच पळापळ झाली होती. टाकरखेडा शंभू या गावातील मोहन लक्ष्मण टवलारे (५५) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यामुळे दुपारी त्यांच्या अत्यंसंस्‍काराला गावातील तसेच बाहेरगावातील नागरीक हजर झाले होते. गावातील अंबराई येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक मधमाशांनी हत्ला चढविला. त्यामुळे अंत्यंविधी मध्येच सोडून नारीकांनी पळ काढला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरीक सैरावैरा पळू लागले. काहींनी नजिकच्या तुरीच्या शेतात आडोसा घेतला. त्यामुळे ते बचावले. काही वेळानंतर मधमाशा निघून गेल्‍याने अंत्यविधी पूर्ण करण्यात आला. मात्र तोपर्यंत या हल्ल्यात ३५ ते ४० जण जखमी झाले होते. काहींनी गावातीलच डॉक्टरकडे धाव घेतली तर काही जण तातडीने वलगाव, अमरावती येथील खासगी रूग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : गडचिरोली : नदीत बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तिघे बचावले; वैनगंगाकाठच्या बोरमाळा घाटावरील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हल्ल्यात मुरलीधर वानखडे (कवठा), सचिन गणोरकर (अकोट), टाकरखेडा संभु येथील सुरेंद्र देशमुख, देवानंद टवलारे, सुधीर टवलारे, राजू निमकर, अनिकेत वानखडे, सुरज कांडलकर, गोपाल देशमुख, बाबू येवतकर, प्रवीण पाटील, वृषभ टवलारे यांच्यासह ३५ ते ४० जणांचा समावेश आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्‍यात पाण्‍याचे बिल भरण्‍यासाठी आलेल्‍या नागरिकांसह परिसरातील विद्यार्थ्‍यांवर मधमाशांनी हल्‍ला केल्‍याने दहा ते बारा जण जखमी झाल्‍याची घटना चांदूर बाजार येथे घडली होती. नागरिक पाण्याचे बिल भरण्यासाठी पाणीपुरवठा कार्यालयात उभे असताना, कार्यालयातील पाण्याच्या टाकीवरील मधाच्या पोळ्यातून अचानक मधमाशा उडू लागल्या. एक अपंग व्‍यक्‍ती मधमाशांनी वेढले गेले आणि बेशुद्ध पडले. पाणी पुरवठा कार्यालयातील अग्निशमन दलाच्या जवानाने त्‍यांच्‍यावर पाण्याचा फवारा मारला. त्‍यामुळे मधमाशा काही काळ दूर झाल्‍या, पण पाण्याची फवारणी थांबल्‍यावर पुन्हा त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर शहरातील अनेक चौकाचौकात मधमाशांचे थवे घिरट्या घालताना दिसल्याने शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आर.आर.काबरा शाळेतील काही विद्यार्थ्यांवरही मधमाशांनी हल्‍ला केला होता. परीक्षा केंद्राच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्‍यामुळे अनर्थ टळला.