बुलढाणा : बीड जिल्ह्यातील स्व. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेक-यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. या घटनेची दृश्ये पाहून तळपायाची आग मस्तकात जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे. पोलीस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हिडीओ असूनही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

या संदर्भात येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे हर्षवर्धन सपकाळ यांनी वरील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. केवळ धनंजय मुंडेच्या राजीनामा घेतला म्हणून सरकार आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना पूर्वीच बडतर्फ का केले नाही? हा खरा प्रश्न आहे. या अमानवी कृत्यांचे सगळे फोटो, व्हिडीओ, पुरावे सुरुवातीपासून पोलिसांकडे होते म्हणजेच गृहमंत्री व सरकारकडे होते. या सैतानांच्या टोळीची अमानवी कृत्यांची संपूर्ण माहिती असूनही दोन महिने सरकार धनजंय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणजे या ‘टोळीला’ सरकारचा पाठिंबा होता आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबायचे होते हे स्पष्ट होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कातडी बचाव प्रयोग यशस्वी होणार नाही

देशमुख कुटुंबियांच्या लढ्याला जनता आणि माध्यमांनी दिलेली साथ यामुळे या प्रकरणातील सत्य उजेडात आले. अन्यथा हे प्रकरण दडपण्यात सरकार यशस्वी झाले असते. आता आपली कातडी वाचविण्यासाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती अशा बातम्या पसरवून अंग झटकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून सुरु आहे. हा त्यांचा कातडी बचाव प्रयोग यशस्वी होणार नाही, त्यांचे सत्य जनतेसमोर आले आहे, त्यामुळे त्यांनी पायऊतार व्हावे अशी आग्रही मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली आहे.