वर्धा : शरद पवार यांच्या रॅलीने आघाडीचे उमेदवार अमर काळे चांगलेच चर्चेत आले. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी व प्रमुख नेते यांच्यात उत्साह संचारला. हा उत्साह कायम असावा म्हणून ठिकठिकाणी छोट्या सभा व गावात प्रचार यात्रा सुरु झाल्यात. मिळत असणारा प्रतिसाद पाहून उमेदवाराच्या राष्ट्रवादी पक्षाचेच नव्हे तर इंडिया आघाडीतील मित्र पक्षाचे नेते पण प्रचारात सक्रिय झाले.

आता अचानक सर्व ठप्प पडले आहेत. कारण उमेदवार काळे यांनी हात आखडते घेत असल्याच्या तक्रारी. तुम्ही खर्च करून टाका. बिले द्या. ते तपासू. योग्य वाटल्यास देवू. अशी भूमिका असल्याने यंत्रणा शिथिल झाली आहे. काळे यांची उमेदवारी सर्वप्रथम एकहाती घेऊन पुढे निघालेले आघाडीचे निमंत्रक अविनाश काकडे म्हणतात या तक्रारीत तथ्य आहे. आठ दिवसांपासून यावर विचार सुरु झाला. किमान झालेल्या कामाचे तत्पर पैसे मिळण्याची अपेक्षा चुकीची नाहीच. यात आता बदल दिसेल. आर्थिक अडचणी दूर केल्या जातील, अशी ग्वाही काकडे यांनी दिली.

हेही वाचा…राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग न्यायालय म्हणाले…

दुसरी बाब स्पष्ट केल्या जाते की उमेदवार सर्वांना घेऊन चालण्यात कमी पडत आहे. त्यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा सर्वेसर्वा माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांना अद्याप उमेदवाराने प्रचारात येण्याची विनंती सुद्धा केली नाही. तशी नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले. इंडिया आघाडीत सहभागी माकपचे नेते यशवंत झाडे सध्या शांतच आहे. काहींना गाडी व पेट्रोलचे कुपन मिळाले. पण झाडे यांना विचारणाच झाली नाही. उबाठा गटाचे मीरापूरकर यांनी कानगाव येथे थेट, घरून कसे पैसे लावणार, असा थेट सवाल करून टाकला. सेलू भागात बचत गटाचे मोठे काम आहे. तिथे त्यांच्याशी संवाद साधने गरजेचे आहे . पण स्थानिक नेते हात पाय गळून बसले आहे. शहर नियोजनातील एक प्रवीण हिवरे म्हणतात हवा चांगली आहे. ती कायम राहली पाहिजे. त्यासाठी आमचे सर्व पातळीवार सूक्ष्म व्यवस्थापन हवे. ते दिसत नाही हे मान्य करतो. जेवन व्यवस्था उमेदवार आप्त सांभाळतो. त्यांचे उद्धट वर्तन तक्रारीत भर घालणारे ठरत आहे.बदल अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे काँग्रेस तर्फे उमेदवारी सुरुवातीला नाकारताना अमर काळे यांनी आर्थिक अडचण मांडली होती. पण राष्ट्रवादी कडून उमेदवारी घेतल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडल्याचे चित्र उमटले होते, असं या घडामोडीतील एकाने निदर्शनास आणले. काळे यांचे मामा असलेले माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या हाती नियोजनाची दोरी आल्यावर सर्वांना हायसे झाले. पण आता हे सर्व चिंतेत पडले आहे. उमेदवार खिश्यातच हात घालत नाही, असे एक गंमतीत म्हणाला. अमर काळे यांना विचारणा केल्यावर त्यांनी तक्रारी असल्याची बाब निखालसपणे मान्य केली. तक्रारी आता दूर होतील. काहींची अडचण आजच दूर करण्याचा प्रयत्न करू. अडचणी असूनही सहकारी जिद्दीने काम करीत आहे, हे महत्वाचे.