अकोला : वाशीम जिल्ह्याला मौसमीपूर्व मुसळधार पावसाने गुरुवारी सायंकाळी झोडपून काढले. काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला असतांना तो शेतमाल पावसाच्या पाण्यात अक्षरश: वाहून गेला. भुईमूग पावसाच्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून तरुण शेतकऱ्याने जीवाच्या आकांताने धडपड केली. मात्र, निसर्गापुढे कुणाचे काही चालत नाही. याचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेऊन प्रचंड नुकसान झालेल्या तरुण शेतकऱ्याला मानोरा बाजार समितीने अखेर शनिवारी मदतीचा हात दिला आहे.

विविध संकटांना तोंड देत घाम गाळून पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला होता. जिल्ह्यात प्रचंड वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे गुरुवारी बाजार समितीच्या परिसरातून पाण्यात शेतमाल वाहून गेला. बोरव्हा येथील तरुण शेतकरी गौरव पवार यांनी भुईमूग मानोरा बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते. अचानक आलेल्या प्रचंड पावसामुळे तो माल वाहून जात होता. काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून तो थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न गौरव पवार यांनी केला. हे विदारक दृश्य कॅमेरात कैद झाले. याचे सविस्तर वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने प्रसारित केले. त्याला व्यापक प्रतिसाद मिळून अनेकांनी शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल दु:ख व्यक्त करून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. त्या वृत्ताची दखल मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतली. गौरव पवार यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या भूईमूग माल भिजल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची जाणीव ठेवली. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे यांच्या हस्ते शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही नुकसान भरपाई मिळाल्याने शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीम जिल्ह्यात पावसाचा अंदाज

वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह (वेग ४०-५० किमी/तास) हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका व अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घ्यावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी सांगितले. जिल्ह्यात आज देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.