अमरावती : आम्‍हाला धमक्‍या मिळताहेत की जास्‍त बोलाल, तर तुरुंगात पाठवू, उखडून फेकून देऊ, मी त्‍यांना म्‍हणतो, जा तुमच्‍या बापाला पाठवा, आजोबा कुणी असतील, तर त्‍यांना पाठवा. बच्‍चू कडूंवर शेतकरी, दिव्‍यांगांच्‍या प्रश्‍नांसाठी साडेतीनशे गुन्‍हे दाखल आहेत. बच्‍चू कडूंनी चार महिने तुरुंगात दिवस काढले आहेत. आला दुपट्टा घातला, आणि नेता झाला, असा बच्‍चू कडू नाही. अजूनही तुरुंगात टाकले, तरी बेहत्‍तर, सर्वसामान्‍यांच्‍या प्रश्‍नांसाठी आम्‍ही आवाज उठवत राहणार, असा इशारा आमदार बच्‍चू कडू यांनी बुधवारी येथे एका जाहीर सभेत दिला.

प्रहार जनशक्‍ती पक्षाचे दिनेश बुब यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रहारने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नेहरू मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलताना बच्‍चू कडू यांनी भाजपवर टीका केली. ते म्‍हणाले, उद्याचा दिवस कसा आहे, हे आपल्‍याला ठाऊक नाही. कदाचित तुरुंगाची पायरीदेखील चढावी लागेल. पण, आपण शेतकरी, शेतमजूर, दिव्‍यांगांचे प्रश्‍न मांडत राहणार. केंद्र सरकारच्‍या चुकीच्‍या धोरणामुळे कांदा, संत्री उत्‍पादकांचे प्रचंड नुकसान झाले. पण, आमच्‍या खासदार काहीच बोलल्‍या नाहीत. फिनले मिल बंद पडली. कामगार रस्‍त्‍यावर आले, काहीच केले नाही. शकुंतला रेल्‍वेच्‍या प्रश्‍नावर त्‍या बोलत नाहीत. केंद्र सरकारला शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्‍न महत्‍वाचे वाटत नाहीत, असे बच्‍चू कडू म्‍हणाले. बच्‍चू कडू यांनी नवनीत राणांवर टीका केला. ते म्‍हणाले, मेळघाटात पिण्‍याच्‍या पाण्‍याची खरी गरज आहे. साड्या वाटून काहीही होणार नाही. मेळघाटातील जनता सर्वकाही जाणून आहे.

हेही वाचा – यवतमाळ-वाशिममध्ये संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख ? राठोड म्हणाले, मला उमेदवारी….

हेही वाचा – प्रतिभा धानोरकरांनी ‘हातउसने’ घेतले ३९ कोटी! निवडणूक आयोगाला दिलेल्या संपत्ती विवरणातील तपशील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवनीत राणांच्‍या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रलंबित आहे. उच्‍च न्‍यायालयाने विरोधात निकाल दिला आहे. पण, आता खरा निकाल जनतेच्‍या न्‍यायालयात लागणार आहे. मातोश्री हे बाळासाहेब ठाकरे यांचे घर. ज्‍यांनी हिंदुत्‍वाचा विचार दिला, त्‍यांच्‍या घरासमोर तुम्‍ही हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरता. हे पठण घरीही होऊ शकते. भाजपचे कार्यालय फोडा म्‍हणजे उमेदवारी पक्‍की, अशी भाजपची स्थिती झाली आहे. भाजपमध्‍ये मोठ्या पदांवर आज उपरे नेते आहेत. भाजपला एकही सच्‍चा उमेदवार मिळू नये, ही शोकांतिका आहे. आम्‍ही उमेदवार देऊ, तुम्‍ही सतरंज्‍या उचला, जय श्रीराम म्‍हणा, अशी भाजपची नीती असल्‍याची टीका बच्‍चू कडू यांनी केली.