गडचिरोली : प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस तसेच नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू २१ मे रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाल्याने नक्षल चळवळीला हादरा बसला आहे. या चकमकीत २७ जण ठार झाले होते. या सर्वांच्या स्मरणार्थ आणि सरकारचा निषेध करण्यासाठी नक्षलवाद्यांकडून १० जून रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य भूपती उर्फ अभय याने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. सोबतच देशभर ‘स्मारक’ सभा देखील आयोजित करणार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

२१ मे रोजी छत्तीसगड- महाराष्ट्र सीमेवर झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजूचा मृत्यू झाला होता. चार दशकांनंतर पहिल्यांदाच नक्षलवाद्यांचा इतका मोठा नेता मारला गेल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे. यावर नक्षलवाद्यांनी पत्र काढून सरकार विरोधात आगपाखड केली आहे. केंद्र सरकारने शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत २१ मे रोजी २७ नक्षलवाद्यांची हत्या केल्याचा आरोप केंद्रीय समितीने काढलेल्या पत्रकात करण्यात आला आहे. केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभयने हे पत्रक काढले आहे. जानेवारी २०२४ पासून केंद्र सरकारने अशाच पद्धतीने ५४० नक्षलवाद्यांना मारल्याचे आरोपही या पत्रकातून करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या याच धोरणाचा विरोध करण्यासाठीच १० जूनला देशव्यापी बंदचे आवाहन ही नक्षलवाद्यांनी केले आहे. एवढेच नाही तर ११ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान बसवराजू आणि इतर मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीत ‘स्मारक सभा’ आयोजित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पत्रकात नक्षलचळवळीतील बसवराजूच्या प्रवासाबद्दलही उल्लेख करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चळवळ संपणार नाही

बसवराजूसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूने पार्टीला मोठा धक्का बसला आहे. पण हे नुकसान शाश्वत नाही. १९७२ साली नक्षल चळवळीचा संस्थापक चारू मुजुमदारच्या मृत्यूनंतरही असेच दावे केले जात होते. मात्र, १९७८ दरम्यान आंध्रप्रदेशसह अनेक राज्यात चळवळ पुन्हा उभी राहिली. १९९९ साली देखील केंद्र समिती सदस्य श्याम, मुरली आणि महेशला ठार करून प्रशासनाने असाच दावा केला होता. पण ही चळवळ सुरूच राहिली. चारू मुजुमदारनंतर गेल्या ५३ वर्षात अनेक मोठे नेते मारले गेले. तरीही ही चळवळ पून्हा उठून उभी राहिली. जोपर्यंत देशात शोषण आहे तोपर्यंत आम्ही संपणार नाही. असे नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने पत्रकात म्हटले आहे.