गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने शेतकऱ्यांच्या उन्हाळी रब्बी धान खरेदीची मर्यादा वाढवणे व महंगाईच्या विरोधात माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, किसान आघाडी योगेंद्र भगत यांच्या नेतृत्वात महात्मा ज्योतिबा फुले चौक, फुलचूर येथून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रातील एकट्या गोंदिया जिल्हयात ६८ हजार हेक्टर वर शेतकऱ्यानी उन्हाळी धानाचे पिक घेतले आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार पिक उत्पादकता सुमारे ४५ क्विंटल येत आहे. दरवर्षी गोंदिया जिल्हयात या हंगामात २२ ते २५ लाख क्विंटल धानाची शासकीय हमीभाव केन्द्रावर खरेदी केली जाते. यावर्षीही या हंगामात सुमारे ३० लाख क्विंटल धानाची खरेदी होईल असा अंदाज आहे. परंतु केन्द्र शासनाच्या दि. २२.४.२०२२ पत्रानुसार संपूर्ण महाराष्ट्राला ११ लाख क्विंटल धान खरेदीची मर्यादा निर्धारित केली आहे. या आदेशानुसार गोंदिया जिल्हयाला फक्त ४ लाख ७९ हजार क्विंटलची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी आपला नुकत्याच निघालेला उन्हाळी धान विकावा कुठे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे जिल्हयातील हमी भावाच्या धान खरेदी केन्द्राला जे मर्यादा दिली आहे. त्या मर्यादेनुसार धान खरेदी केल्यानंतर त्यांचे पोर्टल बंद होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे समोर धान विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण होवून असंतोष पसरलेला आहे.
तसेच रासायनिक खते, बियाणे,सुक्ष्म अन्नद्रव्य खतांचे व किटनाशकांचे भावही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेती करणे पडवडत नाही असा शेतकरऱ्याचा समज होत असुन असंतोष पसरत आहे. फुलचूर चौकातून मोर्चा काढण्यात आला.या मोर्च्यात बैलबंडीवर दुचाकीठेवून महागाई व पेट्रोल डिझेलदरवाढीचाही निषेध नोंदविण्यात आला.चुलीवर भाकरी तयार करुन राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गॅसदरवाढीचा अभिनव विरोध नोंदवला.
यापुर्वी माजी आमदार जैन यांनी केंद्रसरकारमुळे धानउत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचे सांगत राज्यसरकारला धान खरेदीकरीता फक्त ११ लाख क्विटंलची परवानगी देऊन फसवणूक केल्याचा आरोप केला.फुलूचूर येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचल्यानंतर विसर्जीत करण्यात आला.त्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले निवेदन सादर केले.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2022 रोजी प्रकाशित
केंद्रसरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने केले आंदोलन, धान खरेदी मर्यादा वाढविण्याची मागणी
महाराष्ट्रातील एकट्या गोंदिया जिल्हयात ६८ हजार हेक्टर वर शेतकऱ्यानी उन्हाळी धानाचे पिक घेतले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-05-2022 at 20:15 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp protests against central government demands increase limit amy