नागपूर: बकरी ईद म्हणजे कुर्बानीचा सण. या दिवशी मुस्लीम बांधव कुर्बानी म्हणून बोकडाचे (किंवा इतर प्राण्यांचे) बळी देतात. या बलिदानातून मिळालेल्या मांसाचा काही भाग गरीब आणि गरजू लोकांना वाटला जातो. यंदा ७ जूनला बकरी ईद आहे. मात्र, बकरी ईदवरून राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे.

विश्व हिंदू परिषदेने बकरी ईदमध्ये गाेवंश हत्या केली जाते असा आरोप केला. तर राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नीतेश राणे यांनी आभासी पद्धतीने बकरी ईद करावी, असा सल्ला दिला. त्यावर काही महिन्यांपासून मुस्लीम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे राणे यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी म्हटले आहे. यावर भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महत्त्वाचे विधान करून नवीन खुलासा केला आहे.

राणे यांना अल्पसंख्याक आयोगामार्फत नोटीस पाठवणार आहोत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन जे काही बोलतात ते महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुफी कॉरिडॉर बनवण्याचे काम हाती घेऊन देशाला एकतेचा संदेश देत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकोपा राहावा याचे प्रयत्न मोदी आणि फडणवीस सरकार करीत असताना नितेश राणे वातवारण कलुषित करीत आहेत. आम्ही सर्व भारतीय मुस्लिम आहोत, असे प्यारे खान म्हणाले. यावरून नितेश राणे यांच्या वक्तव्यांवर सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण मंगळवारी विदर्भातील भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेच्या निमित्ताने नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यशी संवादही साधला. यावेळी चव्हाण यांना राणे यांच्या दोन धर्मात तेढ निर्माण करण्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पक्षाकडून सर्वच धर्माचा सन्मान केला जातो. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे सण, उत्सव हे त्यांच्या परंपरांनुसार साजरे करावे. त्याला कुणीही विरोध करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले. तसेच नितेश राणेंवर पक्ष कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी याला उत्तर देण्यास नकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले होते राणे?

काही लोक पर्यावरणाच्या कारणास्तव आपल्या सणांमध्ये फटाके किंवा रंग वापरू नका असा सल्ला देतात. ते आता कुठे गेले आहेत? बकरी ईदचा आभासी उत्सव (प्राण्यांच्या बलिदानाचा समावेश नसून) का साजरा केला जात नाही? होळी किंवा दिवाळीसारखे सण आभासी पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन करणारे प्राणीप्रेमी कुठे आहेत, असा सवाल नितेश राणे यांनी केला.