नागपूर, मुंबई : महाराष्ट्राच्या विकासातील ११ तारे उदयाला येत आहेत. यातील पहिला तारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. पायाभूत सुविधा म्हणजे केवळ निर्जीव रस्ते, सिमेंट, लोखंड नाही तर संवेदनशीलपणे विकासाला चालना, असा त्याचा अर्थ आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

मिहान परिसरात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासह ७५ हजार कोटी रुपयांच्या विविध ११ प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या ११ प्रकल्पांचा उल्लेख मोदी यांनी, ‘‘११ ताऱ्यांचे नक्षत्र’’ असा केला. त्यातला पहिला तारा समृद्धी असल्याचे ते म्हणाले.

mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…

मोदी म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे नागपूर- मुंबईदरम्यानचे अंतर कमी होईलच, पण हा महामार्ग २४ जिल्ह्यांना जोडत असल्यामुळे शेतकरी, उद्योगांना मोठा फायदा होईल. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

पंतप्रधान मोदी सकाळी ११च्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या आरंभिबदूवर पोहोचले. तेथून त्यांनी वायफळ टोल नाक्यापर्यंतचा १० किमीचा प्रवास केला. त्यानंतर वायफळ येथे साडेअकराच्या सुमारास समृद्धीचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर नागरिकांनी जल्लोष केला.

व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

शॉर्टकट ही विकृती

निवडणुकांमध्ये मोफत योजना जाहीर करणाऱ्या आणि सवलतींची आश्वासने देणाऱ्या राजकीय पक्षांवरही पंतप्रधान मोदी यांनी टीका केली. ते म्हणाले,‘‘सत्ताप्राप्तीसाठी काही राजकीय पक्ष राजकारणाचा ‘शॉर्टकट’ मार्ग अवलंबतात. मात्र, तो देशासाठी घातक असून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करणारी ती एक विकृती आहे. ‘शॉर्टकट’ने कोणताही देश चालू शकत नाही, देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास, दूरदृष्टी आवश्यक आहे.’’

देशात आणि राज्यात संवेदनशील सरकार असून, प्रत्येक प्रकल्पात मानवी संवेदना आहे, असे नमूद करीत मोदी म्हणाले,‘‘मी महाराष्ट्रासह देशातील सर्व लोकांना राजकारणात येत असलेल्या विकृतीपासून सावध करू इच्छितो. खोटी आश्वासने देऊन सत्तेत येणारे कधीही देश घडवू शकत नाहीत.’’ ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ असे धोरण अवलंबणारे, देशाला आतून पोकळ बनवतील. तरुणांनी, करदात्यांनी अशा स्वार्थी राजकीय पक्षांना आणि नेत्यांना उघडे पाडावे, असेही मोदी म्हणाले.

वेगवान प्रवासाचे स्वप्न साकार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रविवारी दुपारी २ वाजता महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला. या महामार्गावरून ताशी १२० किमी वेगाने प्रवास करता येईल. वेगवान वाहन चालवण्याचा अनुभव घेण्यासाठी आलेल्यांची संख्या यावेळी मोठी होती, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डबल इंजिनसरकार आणि गोसेखुर्द

महाराष्ट्रात ‘डबल इंजिन’ सरकार वेगाने काम करीत आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे उहाहरण दिले. तीन दशकांपूर्वी भूमिपूजन झालेला हा प्रकल्प रखडल्याने त्याचा खर्च ४०० कोटींवरून १८ हजार कोटींवर गेला. ‘डबल इंजिन’ सरकार आल्यापासून या धरणाच्या कामाने वेग घेतला आहे. या वर्षी हे धरण पूर्ण भरेल, याचा आनंद आहे, असे मोदी म्हणाले.

क्षणचित्रे..

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ‘‘आज संकष्टी चतुर्थी आहे. या शुभदिनी अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणे हा शुभसंकेत आहे’’ असे सांगत त्यांनी टेकडी गणपतीलाही वंदन केले. मोदींच्या दौऱ्यामुळे हे मंदिर आज बंद होते.

– पंतप्रधानांनी फ्रीडम पार्क ते खापरी स्थानकादरम्यान मेट्रोतून प्रवास केला. यासाठी त्यांनी रितसर तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट खरेदी केले. प्रवासात त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला.

– समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांनी ढोलवादनही केले.

प्रकल्पात अडथळ्यांचा प्रयत्न होता : शिंदे

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला काही लोकांनी विरोध केला होता. भूसंपादनात अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या. पण, त्यावर आम्ही मात केली, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांचा रोख ठाकरे गटावर होता, असे मानले जाते. प्रकल्पाचे उद्घाटन आणि त्यास दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असेही शिंदे म्हणाले.

मोदींमुळेच स्वप्न पूर्ण : फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार्य केल्यानेच समृद्धी महामार्गाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या प्रकल्पाबाबत शिंदे यांच्यावर विश्वास होता. या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मेट्रो-२, नागनदी शुद्धीकरण प्रकल्प महाविकास आघाडीमुळे रखडले होते. आम्ही त्रुटी दूर केल्यावर केंद्राने त्याला मंजुरी दिली, असे ते म्हणाले.

सत्ताप्राप्तीसाठी काही राजकीय पक्ष राजकारणाचा ‘शॉर्टकट’ मार्ग अवलंबतात. मात्र, तो देशासाठी घातक असून, करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करणारी ती एक विकृती आहे. ‘शॉर्टकट’ने कोणताही देश चालू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी शाश्वत विकास आवश्यक आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान