पाणी देण्यासाठी एकच टँकर; विभागात १८० पदे रिक्त नागपूर : नागरिकांच्या सुविधेसाठी असलेली शहरातील अनेक उद्याने देखभालीअभावी श्वास कोंडल्यासारखी झाली आहेत. उद्याने ही शहराच्या पर्यावरणात भर घालणारी असतात. मात्र शहरातील उद्यानांची अवस्था पाहिल्यावर त्यांना कुणीही वाली नसल्याचे जाणवते. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारित सध्या १३१ उद्याने आहेत. सुधार प्रन्यासकडील ३८ उद्यानांची जबाबदारीही महापालिकेकडे आली आहे. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उद्यान विभाग दुबळा झाला. विभागाकरिता २७३ पदे मंजूर आहेत, त्यापैकी ९३ पदे भरण्यात आली असून १८० पदे रिक्तच आहेत. या ९३ पैकी उद्यान विभागात केवळ ४२ कर्मचारी कार्यरत असून ५१ कर्मचाऱ्यांची रवानगी इतर विभागात करण्यात आली आहे. आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असताना त्यातीलही कर्मचारी इतर विभागात पाठवण्यात आल्याने उद्यानाची देखभाल तरी कशी करायची असा प्रश्न आहेच. एकच मजूर पाच ते सहा ठिकाणी काम करतो. एवढय़ा मोठय़ा शहरातील एवढय़ा मोठय़ा संख्येने असलेल्या उद्यानांना पाणी देण्यासाठीही केवळ एकच आणि तो देखील लहान टँकर आहे. शहरात वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला जात असताना आहे ती हिरवळ टिकवण्यासाठी सुद्धा उद्यान विभागाकडे कर्मचारी नसल्याचे माहिती अधिकारातून मागितलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. अॅड. अनुप सिंग परिहार यांनी ही माहिती मागितली होती. त्यातील अजून बरीच माहिती हाती यायची असून महापालिकेकडून माहिती मिळत नसल्याचेही त्यांनी माहिती आयोगाला कळवले आहे.