नागपूर : भारत सरकारद्वारे देशभरात विमानसेवेचे जाळे विणण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून छोट्या विमानसेवेद्वारे लहान शहरात ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवणाऱ्यावर भर दिला जात आहे. परंतु, महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीमध्ये प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत कैकपटीने वाढूनदेखील येथे विमानांची संख्या आणि नवीन विमान कंपन्यांची सेवा वाढवण्यात येत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, एका कंपनीची मक्तेदारी निर्माण होत आहे.

गेल्या काही वर्षांत नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत नागपूर विमानतळावर २८,८८,४७६ प्रवाशांची संख्या नोंदवली गेली. यामध्ये देशाअंतर्गत प्रवास करणारे २७,८५,८५१ आणि परदेशी प्रवाशांची संख्या १०२,६२५ इतकी होती. २०२२ या वर्षांत २२,६७,६२२ प्रवासी संख्या नोंदवली गेली. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूर येथून उड्डाणांची संख्या वाढवणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. सध्या एअर इंडियाचे मुंबईहून नागपूरला येणारे आणि नागपूरहून मुंबईला जाणारे विमान आहे. एअर इंडियाच्या उड्डाणाची वेळ गैरसोयीची आहे. शिवाय हे उड्डाण अनेकदा विलंबाने होत असते. इंडिगोची मुंबईला जाणारी आणि नागपूरला येणारी चार विमाने आहेत. यात सकाळी दोन, दुपारी एक आणि रात्री एक विमान आहे. मुंबईहून नागपूरसाठी सकाळी दोन, सायंकाळी दोन आणि रात्री एक विमान आहे. इंडिगोच्या विमानांमध्ये खूप गर्दी असते. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत प्रवास करावयाचा झाल्यास २८ हजार रुपयांपर्यंत एकेरी प्रवासाचे भाडे मोजावे लागते.

हेही वाचा – सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

प्रवासी संख्या बघता येथून आणखी नवीन कंपनीची विमानसेवा सुरू व्हावी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न करायला हवे, असे मत नागपूर येथील एक प्रवासी अभिजीत सोनटक्के यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी

खासगी कंपन्या नफा-तोट्याचा विचार करून सेवा देत असतात. त्यानुसार विमानसेवेचे शहर (मार्ग) ते निश्चित करीत असतात. – आबिद रुही, वरिष्ठ संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ.