अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या फलकाची विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील चान्नी गावात घडला आहे. या प्रकरणामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची पोलिसांनी तत्काळ दखल घेत तीन जणांना ताब्यात घेतले. खबरदारी म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी देशभरात उत्साहाचे वातावरण होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. अकोला शहरासह जिल्ह्यात देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात सर्वत्र शांततेत व उत्साहात कार्यक्रम सुरू होते. दरम्यान, पातूर तालुक्यातील चान्नी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दर्शनी जागेत समाजातील काही युवकांनी शुभेच्छा फलक लावला होता. या फलकाला काही समाज कटकांनी विद्रुप करून त्याची विटंबना केली. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली.

चान्नी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. प्रकरणाची सखोल माहिती घेत तीन युवकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चान्नी पोलिसांची पुढील कारवाई सुरू असून गावात शांतता आहे.

अकोला शहरातही झाली होती दगडफेक

अकोला शहरातील वाशीम बायपास चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एका असामाजिक तत्त्वाच्या गटाने वाद घातला होता. या वादातून एका दुचाकीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. या विरोधात दुसरा गट देखील समोर आला. त्यांनी प्रत्युत्तरात समोरच्या गटावर दगडफेक केली. दोन गटातील वादातून परस्परविरोधी दगडफेकीच्या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. दगडफेक करणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर आळा बसण्यासाठी पोलिसांनी बळाचा सौम्य वापर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील वाशीम बायपास हा अत्यंत संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात सुरू असताना काही असमाजिक तत्त्वांनी वाद निर्माण केला होता. तेल्हारा तालुक्यात देखील ध्वजावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात सर्वत्र शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.