दर्दी खवय्यांना प्रिय असलेल्या पाणकोंबडीची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यास पकडण्यासाठी एका युवतीने दाखविलेले धाडस वन्यजीव प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. वर्धेलगत नालवाडी येथील एका सदनिकेत राहणाऱ्या या धाडसी युवतीचे नाव मंजली मिश्रा आहे.

‘त्या’ दोघांची हत्या बदनामीच्या भीतीने; बुटीबोरीतील हत्याकांडाचे गूढ उलगडले

घरासमोरच्या परिसरात पाणकोंबड्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या शिकाऱ्यावर तिचे काही दिवसांपासून लक्ष होते. शिकारी या कोंबड्यांना पोत्यात कोंबत असल्याचे दिसताच मंजलीने त्याला हटकले, त्याने पळ काढला. ते पाहताच तिने करूनाश्रमचे आशीष गोस्वामी यांना कळविले, पक्षीप्रेमी पराग दांडगे यांना मदतीस बोलावले. मात्र, त्यांची प्रतीक्षा न करता ती स्वत: आपल्या दुचाकीने शिकाऱ्याच्या मागावर निघाली. तोवर पराग व ऋषिकेश हेही पोहचले. एका चौकात मंजलीने त्याला अडविले. त्याने मंजलीला शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली. मात्र त्यास न घाबरता ती वाट अडवून बसली. परागची मदत मिळताच त्या शिकाऱ्यास दुचाकीवर बसवून ते थेट लगतच्या वन विभागाच्या कार्यालयात पोहचले. तिथे पंचनामा वैगरे सोपस्कार झाले. तंबी देऊन शिकाऱ्याला सोडून देण्यात आले. कोंबड्याही सुटका होताच पळाल्या.

हा निसर्गाचा ठेवा आपण जपलाच पाहिजे –

या धाडसामुळे मंजलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. “पशुपक्ष्यांवर घात घालणे मला पटतच नाही. हा निसर्गाचा ठेवा आपण जपलाच पाहिजे. युवा पिढीने हे धन सांभाळले पाहिजे.”, अशी भावना तिने व्यक्त केली.

‘त्या’ दोघांची हत्या बदनामीच्या भीतीने; बुटीबोरीतील हत्याकांडाचे गूढ उलगडले

पाणकोंबडी ही वात विकारावर उपयुक्त असल्याचा गैरसमज आहे, तसेच रुचकर मांस म्हणूनही तिची शिकार केली जाते. त्याला मागणी असल्याचे आरोपी शिकारी सांगत होता. तर, मंजलीचा आदर्श युवा पिढीने घेण्यासारखा आहे, असे पक्षीप्रेमी पराग दांडगे म्हणाले.