जन औषधशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांचा सूर;‘आयएपीएसए- कॉन’ परिषद ३ मार्चपासून नागपूर : करोनाचा विषाणू वेळोवेळी रूप बदलत आहे. त्यावर पुढे काय, याचे उत्तर कुणाकडे नाही. परंतु ओमायक्रॉनचे मोठय़ा प्रमाणावरील संक्रमण आणि देशात चांगल्या प्रमाणात झालेल्या लसीकरणाचा फायदा झाल्याने तिसरी लाट सौम्य होती. त्यामुळे पुढची लाटही सौम्य राहण्याचा अंदाज आहे. परंतु वेळेनुसार हा अंदाज बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा सूर जनऔषधशास्त्र विषयातील तज्ज्ञांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मेडिकलच्या एपीआय सभागृहात गुरुवारी जनऔषधशास्त्र विषयातील तज्ज्ञांसाठी महत्त्वाच्या आयएपीएसएम- कॉन या नागपुरात ३ ते ५ मार्च दरम्यान आयोजित राष्ट्रीय परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हे तज्ज्ञ बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. उदय नारलावार म्हणाले, करोनाचा अभ्यास केल्यास तो वेळेवेळी रूप बदलत आहे. नवीन रूपाला जुन्या विषाणूपासून निर्माण प्रतिकारशक्ती हवी तशी उपयोगी पडत नाही. परंतु लसीकरणासह पूर्वी झालेल्या संक्रमणातून निर्माण प्रतिकारशक्तीचा काही प्रमाणात फायदाही होतो. ओमायक्रॉनचे निरीक्षण केल्यास तिसरी लाट सौम्य होती. त्यामुळे पुढची लाटही सौम्य राहण्याचा फक्त प्राथमिक अंदाज आहे. परंतु विषाणूत जनुकीय बदल जास्तच झाल्यास लाट गंभीरही होऊ शकते. सचिव डॉ. अशोक जाधव म्हणाले, भारतात लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे. परंतु जगातील गरीब देशांत आजही लसीकरण खूप कमी आहे. त्यामुळे या गरीब देशात विषाणूत जनुकीय बदलाची शक्यता जास्त असून तसे झाल्यास पुन्हा नवीन लाट गंभीर वळण घेऊ शकते. डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, शासनाचे नियम कटाक्षाने पाळल्यास करोनावर नियंत्रण शक्य आहे. डॉ. समीर गोलावार म्हणाले, ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परिषदेत चाईल्ड डेव्हलपमेंट, न्यूट्रीशन, मॅटरनल अॅण्ड चाईल्ड हेल्थ, डिजास्टर मॅनेजमेंट, टीबी, मेंटल हेल्थसह इतरही विषयांवर मंथन होईल. डॉ. सुषमा ठाकरे म्हणाल्या, परिषदेला प्रमुख्याने डॉ. जेम्स लांनचार्ड, डॉ. आशा, डॉ. गजानन वेल्लाळ, डॉ. प्रदीप आवटे, डॉ. बी. एस. गर्गसह इतरही देश- विदेशातील तज्ज्ञ उपस्थित राहतील. डॉ. सरिता वाघवा म्हणाल्या, परिषदेत देशाच्या वेगवेगळय़ा भागातील आजपर्यंत १,७०० प्रतिनिधींची नोंदणी झाली असून ही संख्या अडीच हजारापर्यंत जाण्याची आशा आहे. डॉ. सोनाली पाटील यांनीही आपले मत मांडले.