अमरावती : दर्यापूर- अकोला मार्गावर लासूर नजीक दोन कार समोरासमोर धडकल्याने झालेल्‍या भीषण अपघातात तीन युवक ठार झाले असून तीन जण जखमी झाले. सोमवारी दुपारी ३ वाजताच्‍या सुमारास हा अपघात घडला.

आनंद बाहकर (२६, रा. सांगळूदकर नगर, दर्यापूर), विनीत बिजवे (३९, रा. साईनगर, दर्यापूर), प्रतीक बोचे (३८, रा. सांगळूदकर नगर, दर्यापूर) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण एमएच २७ / डीई ६२६० क्रमांकाच्‍या क्रेटा कारने दर्यापूरहून अकोला येथे जात होते. दर्यापूर ते अकोला मार्गावर लासूर नजीक विरूद्ध दिशेने येत असलेल्‍या एमएच २९ / बीसी ७७८६ क्रमाकांच्‍या ऑडी कार आणि क्रेटा कार यांच्‍यात धडक झाली. या अपघातात क्रेटा कारमधील आनंद बाहकर, विनीत बिजवे आणि प्रतीक बोचे यांचा मृत्‍यू झाला. ऑडी कारमधून प्रवास करणारे आकाश रमेश अग्रवाल, रमेश अग्रवाल (दोघेही रा. बाभळी, दर्यापूर) आणि क्रेटा कारमधील पप्‍पू घाणीवाले (रा. बनोसा, दर्यापूर) हे जखमी झाले आहेत.

हेही वाचा >>>यवतमाळ : पतंगीचा जीवघेणा खेळ! नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा…

प्रतीक, आनंद व विनीत व पप्पू हे चौघे जण एमएच २७/डी ई ६२६० क्रमांकाच्या कारने अकोला येथे जात होते. विरुद्ध दिशेने आकाश अग्रवाल यांची कार (क्रमांक एमएच २९/ बीसी ७७८६) अकोल्‍यावरून दर्यापूर कडे येत होती. अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही कार समोरासमोर धडकल्या. अपघात एवढा भीषण होता की, प्रतीक बोचे व विनीत बिजवे यांचा जागीच मृत्यू झाला. तर आनंद बाहकर याला दर्यापूरच्‍या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. ही माहिती नातेवाईक व त्‍यांच्‍या मित्रांना मिळताच सर्वांनी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी रुग्‍णालयासमोर मोठी गर्दी झाली होती. जखमी अग्रवाल पिता पुत्रांना तसेच इतर जखमींना उपचारासाठी अकोला येथील रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला असून अपघातात प्राण गमावणाऱ्यांची गेल्या सहा-सात महिन्यांतील संख्या भयावह आहे. गेल्या सहा महिन्यांत १४६ प्राणांतिक अपघात होऊन त्यांत १६६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अलीकडच्या काळात राष्ट्रीय, राज्य महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. त्यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. अनेकदा दुचाकी वाहनचालक वाहतूक नियम न पाळता वाहने चालवितात. त्यातून अपघातांची संख्या वाढली आहे.