अकोला : वाशीम जिल्ह्याला मोसमी पूर्व मुसळधार पावसाने गुरुवारी सायंकाळी झोडपून काढले. काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला असतांना तो पावसाच्या पाण्यात अक्षरश: वाहून गेला. भुईमूग पावसाच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी तरुण शेतकऱ्याने जीवाच्या आकांताने धडपड केली. मात्र, निसर्गापुढे कुणाचे काही चालले नाही. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमातून चांगलीच प्रसारित झाली. तरुण शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल थेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी घेतली. त्यांनी भ्रमणध्वनीवरून नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी संवाद साधला. केंद्र व राज्य सरकार पाठीशी असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

विविध संकटांना तोंड देत घाम गाळून पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला होता. प्रचंड वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे गुरुवारी मानोरा बाजार समितीच्या परिसरातून पाण्यात शेतमाल वाहून गेला. बोरव्हा येथील तरुण शेतकरी गौरव पवार यांनी भुईमूग मानोरा बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते. अचानक आलेल्या प्रचंड पावसामुळे तो माल वाहून जात होता. काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून तो थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न गौरव पवार यांनी केला. हे विदारक दृश्य कॅमेरात कैद झाले. याचे सविस्तर वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने प्रसारित केले. त्याला व्यापक प्रतिसाद मिळून अनेकांनी शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल दु:ख व्यक्त केले.

दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी देखील घटनेची दखल घेऊन प्रशासनामार्फत नुकसानग्रस्त शेतकरी गौरव पवार यांच्याशी संपर्क केला. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. शेतकऱ्याशी संवाद साधताना ते म्हणाले, “आपल्या संकटसमयी केंद्र व राज्य सरकार संपूर्णपणे पाठीशी असून याची नुकसान भरपाई दिल्या जाईल. भुईमुगाचा उरलेला माल देखील त्या दिवशीच्या भावाने खरेदी करण्यात येईल.” थेट कृषिमंत्र्यांनी संपर्क करून संवाद साधल्याने नुकसानग्रस्त शेतकरी भारावून गेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून प्रकृतीची, कुटुंबाची विचारपूस

“आमच्याकडे पाच एकर शेती असून वडील आजारी असल्याने आता मीच शेती करतो. पावसामुळे मानोरा बाजार समितीतून सात ते आठ क्विंटल भुईमूग वाहून गेले. डोक्यावर कर्ज असल्याने मी तणावात होतो. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचा मला फोन आला. त्यांनी माझ्या प्रकृतीची, कुटुंबाची विचारपूस केली. नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. मी त्यांचा आभारी आहे,” असे गौरव पवार यांनी सांगितले.