बुलढाणा: लाखावर बुलढाणा परिसरवासियांसह प्रशासनाचीही चिंता वाढविणारी ही बातमी आहे. याचे कारण बुलढाणा शहरासह परिसरातील खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या येळगाव धरणात सध्या अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. हा साठा एक महिना पुरेल एवढाच असल्याने सर्वांची चिंता वाढणे स्वाभाविक आहे.

बुलढाणा चिखली राज्यमार्गावरील येळगाव धरणातून बुलढाणा शहर व परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. बुलढाणा तालुक्यातील मढ या जागृत शिवालय नजीक उगम पावणाऱ्या पैनगंगा नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. जिल्ह्यात इतरत्र अतिवृष्टी व पुराने थैमान घातले असताना बुलढाणा तालुक्यावर मात्र पावसाने यंदा अवकृपा दाखविली आहे. आज ९ ऑगस्ट अखेरीस तालुक्यात केवळ २७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरी ८६० मिलीमीटरच्या तुलनेत आजवर केवळ २३३ मिमी इतका अपुरा पाऊस झाला आहे. त्यातही झालेला पाऊस मध्यम व रिमझिम स्वरूपाचा होता. त्यामुळे पैनगंगाला एकही पूर आला नाही. यामुळे येळगाव धरणात आज १५ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे.

हेही वाचा – मध्य रेल्वेच्या ९ ते २३ ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द; वाचा कारण काय ते….

हेही वाचा – नागपूर : काटोल-नरखेडमध्ये असं काय घडलं की, एक हजार मुलींना द्यावी लागली ‘एचपीव्ही’ची लस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या धरणात ६००.९६ मीटर इतकाच साठा आहे. हा साठा ९ सप्टेंबर २०२३ पर्यंत पुरू शकेल असा अंदाज संबधित अधिकऱ्यांनी वर्तविला आहे. नजीकच्या काळात जोरदार पाऊस झाला नाही तर जिल्हा मुख्यालयाला जल संकटाचा सामना करावा लागू शकतो.