नागपूर: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने २०२३ शैक्षणिक वर्षापासून विविध अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात प्रचंड वाढ केली होती. जवळपास ३५ ते ७५ टक्के असलेल्या शुल्कवाढीचा फटका गरीब विद्यार्थ्यांना बसला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने बी.ए.-१ व बी.कॉम.-१ चे शैक्षणिक शुल्क रु.१७०२ वरून रु.२९८८ करण्यात आले आहे.

बी.एस.सी.च्या अभ्यासक्रमात ५५ टक्के, डी.सी.एम.च्या अभ्यासक्रमात ३५ टक्के, एम.ए. अभ्यासक्रमांत ३६ टक्के अशी जवळपास सर्वांचे अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्याहून जास्त विद्यार्थी हे बी.ए. व बी.कॉम. अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे याच अभ्यासक्रमांमध्ये मुक्त विद्यापीठाने नेमकी ७५ टक्के शैक्षणिक शुल्का मध्ये वाढ केल्याने, समाजातील गरीब विद्यार्थी, जे पारंपरिक विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही,ते मुक्त विद्यापीठामध्ये पण पैशाअभावी प्रवेश घेऊ शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र आता मुक्त विद्यापीठाचा नवा प्रकार समोर आला आहे. एकीकडे विद्यापीठ विद्यार्थ्यांचे शुल्क वाढवते तर दुसरीकडे गझल कार्यक्रम घेऊन या अवास्तव खर्च करत असल्याची बाब समोर आली आहे.

हे ही वाचा… विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

काय आहे कार्यक्रम?

मराठी शायरीचे नामवंत शायर स्व. भाऊसाहेब पाटणकर यांचे स्मरणार्थ व नववर्षाच्या स्वागतानिमित्त बुधवार १ जानेवारी रोजी मुकुंद दीक्षित यांचा गझल सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुलगुरू महोदयांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम शैक्षणिक इमारतीतील सभागृहात झाला. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्रकुलगुरू, डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते. तसेच प्राधिकरण सदस्य आणि इतरांना ही या कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. त्यामुळे विद्यापीठ एकीकडे शुल्क वाढत असताना दुसरीकडे असे मनोरंजनाचे कार्यक्रम घेणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमावर उधळपट्टी का?

भरीस भर म्हणून २०२३ च्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले प्रवेश शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले होते. यापूर्वी दोन टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची मुभा विद्यार्थ्यांना होती. प्रवेश शुल्क एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची बाब असो की एकाच टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची अट असो, त्यामुळे आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असलेले विद्यार्थी लाभ घेऊ शकत नाही. अशी गंभीर परिस्थिती असताना मुक्त विद्यापीठाने मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा खर्च का वाढवला अस प्रश्न उपस्थित केला जात आहे.