उच्च क्षमतेची वीज जोडणी मिळाल्यानंतर मुहूर्त

नाशिक : मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान यंत्रांना जोडलेल्या व्हीव्ही पॅटमधील तब्बल १२ लाख चिठ्ठय़ा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अंबडच्या अन्न महामंडळाच्या गोदामात आवश्यक त्या क्षमतेची वीज जोडणी नसल्याने हे काम पुढे सरकत नव्हते. आवश्यक ती पूर्तता झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या देखरेखीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील व्हीव्ही पॅटमधील मतदान चिट्ठय़ा यंत्राच्या आधारे नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले.

नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आठ महिन्यांपूर्वी झाली होती. या निवडणुकीत मतदान यंत्रावर अनेक राजकीय पक्षांनी साशंकता व्यक्त केली होती. संबंधितांचे आक्षेप फेटाळत निवडणूक आयोगाने यंत्रात फेरफार करून दाखविण्याचे आव्हान दिले होते. ते कोणी पेलू शकले नाही. मतदान प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष, नागरिकांमधील साशंकता दूर करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान यंत्राला व्हीव्ही पॅट जोडण्यात आले होते. या यंत्रामुळे मतदाराला आपण कोणाला मतदान केले, याची माहिती छापील चिट्ठीवर पाहण्यास मिळाली. मतदानानंतर काही सेकंदापुरती दिसणारी चिठ्ठी यंत्रातील एका कप्प्यात जमा होत असे. नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत एकूण ११ लाख २२ हजार ९२ जणांनी मतदान केले होते. त्यातील ८६० मते अवैध ठरली. याशिवाय मतदान प्रक्रिया सुरू करताना रंगीत तालीम वेळी यंत्राचा वापर झाला. या प्रक्रियेत व्हीव्ही पॅटमध्ये प्रत्येक मतदाना वेळी चिट्टय़ा जमा झाल्या.  अंबडच्या अन्न महामंडळाच्या गोदामात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकाल जाहीर झाले. निवडणूक आयोगाने मध्यंतरी व्हीव्ही पॅटमधील चिठ्ठय़ा नष्ट करण्याची सूचना केली होती.

प्लास्टिकचे पातळ आवरण असणाऱ्या या चिठ्ठय़ा असून ते नष्ट करण्यासाठी विशिष्ट यंत्राचा वापर केला जाणार आहे. त्या यंत्रासाठी तीन फेजच्या वीज जोडणीची गरज होती. अंबडच्या गोदामात ती नसल्याने चिठ्ठय़ा नष्ट करण्याचे काम रखडले होते. निवडणूक शाखेने या जोडणीसाठी महावितरणकडे पाठपुरावा केला. त्या क्षमतेची जोडणी मिळाल्यानंतर बुधवारी हे काम सुरू करण्यात आले. निवडणूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या देखरेखीत १५ कामगारांच्या मदतीने व्हीव्ही पॅटमधून चिठ्ठय़ा काढण्याचे काम सुरू झाले. जवळपास १२ लाख मतदान चिठ्ठय़ा यंत्राद्वारे नष्ट केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.