जुन्या नाशिकमधील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभिकरणाच्या नावाखाली काढून घेण्यास पाच ते सहा वर्ष झाल्यानंतरही पुतळा पुन्हा बसविण्यात आला नसल्याबद्दल छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने नाराजी व्यक्त केली आहे. पुतळा त्वरीत बसविण्याची मागणीही ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
आंबेडकर जयंतीची मिरवणूक दरवर्षी राजवाडय़ापासूनच सुरू होते. अशा ठिकाणी शहरातील सर्वाधिक जुना पुतळा सुशोभिकरण व नूतनीकरणासाठी पाच ते सहा वर्षांपूर्वी महानगरपालिकेकडून काढण्यात आला. परंतु, अजूनही पुतळा बसविण्यात आलेला नाही. पालिकेकडून पुतळा तयार असल्याचे सांगण्यात येते. पुतळा बसविण्यासाठी पालिकेने चबुतराही तयार केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या परवानगीअभावी पुतळा बसविणे रखडले असल्याचे सांगितले जाते. सहा डिसेंबर म्हणजेच बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनापर्यंत पुतळा बसविण्याची मागणी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे.