जिल्ह्य़ात १६९५ कोटींची थकबाकी

वीज देयकांच्या वाढत्या थकबाकीला प्रतिबंध करण्यासाठी ‘महावितरण’ ने जिल्ह्यात शुक्रवारपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या विशेष मोहिमेत गावागावात कार्यरत वीज कर्मचाऱ्यांसमवेत वरिष्ठ अधिकारीही सहभागी होणार आहेत. ‘महावितरण’ची जिल्ह्य़ात तब्बल १६९५ कोटी १६ लाखाची थकबाकी असून या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सात लाख ४७ हजार २५६ वीज ग्राहकांकडे ‘महावितरण’चे १६९५ कोटी १६ लाख रुपयांचे वीज देयक थकीत आहे. ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी ‘महावितरण’ला अगोदर वीज खरेदी करावी लागते. महिनाभराच्या वीज पुरवठय़ानंतर ग्राहकांना वापरलेल्या विजेचे देयक देऊन हे देयक भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येते. वीज वापरानंतर जवळपास ४० ते ४५ दिवसांनंतर नियमित देयक भरणाऱ्या ग्राहकांकडून त्यांनी वापरलेल्या विजेचे पैसे ‘महावितरण’ला मिळतात. त्यातही अनेक ग्राहक नियमित देयक भरत नसल्याने ‘महावितरण’चा आर्थिक ताळेबंद विस्कळीत होतो. सद्यस्थितीत वीज क्षेत्रातील उधारीचे दिवस संपल्याने ‘महावितरण’ला आर्थिक आघाडीवर तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वीज देयकाची नियमित वसुली अथवा वीज पुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय असल्याचे ‘महावितरण’ने म्हटले आहे.

त्यानुसार नाशिक शहर एक आणि दोन, नाशिक ग्रामीण, चांदवड, मालेगाव, मनमाड, सटाणा, कळवण या आठही विभागीय कार्यालयाच्या स्तरावर स्थापन केलेल्या विशेष पथकांसह गावागावात कार्यरत वीज कर्मचारी या विशेष मोहिमेत सहभागी होणार आहे.

५२ टक्के ग्राहक थकबाकीदार

जिल्ह्यत एकूण १४ लाख ४१ हजार ६१९ वीज ग्राहक असून त्यातील सात लाख ४७ हजार २५६ म्हणजेच जवळपास ५२ टक्के ग्राहक थकबाकीदार आहेत. त्यात थकबाकीदार घरगुती ग्राहकांची संख्या तीन लाख ७३ हजार ४३१ (थकबाकी ४६ कोटी). व्यावसायिक ग्राहक ४५ हजार ९२६ (३९ कोटी). औद्योगिक ग्राहक पाच हजार आठ (सात कोटी), कृषिपंप  ग्राहक तीन लाख सात हजार ८१९ (१४९२ कोटी), सार्वजनिक पाणी पुरवठा योजना १४८९ (२३ कोटी), पथदिवे ३७३७ (१०४ कोटी), इतर ग्राहक ९८५६ (१३ कोटी) अशी आकडेवारी आहे.