मुख्यमंत्र्यांचा केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा हवाई दलात सवरेत्कृष्ट वैमानिक प्रशिक्षक म्हणून गौरविण्यात आलेले मेजर अतुल गर्जे यांचे फेब्रुवारी २०११ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले अन् त्यांची वीरपत्नी हर्षला यांचा तीन महिन्याच्या चिमुरडीला घेऊन अक्षरश: जगण्याचा संघर्ष सुरू झाला. सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढले. सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर हक्क सांगत न्यायालयात दावे दाखल केले. मुलीचाही ताबा मागितला. उच्चशिक्षित हर्षला यांना लष्करी सेवेत जाण्याची इच्छा होती. परंतु, न्यायालयीन वाद व लहानग्या मुलीचा सांभाळ यामध्ये चार-पाच वर्षे गेली. रहायला घर नाही की हाती काम नाही, या विवंचनेत सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजविणाऱ्या वीरपत्नीची लढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. देशाची सेवा करताना प्राणाची बाजी लावणाऱ्या लष्करातील अधिकारी-जवानांच्या वीरपत्नी व कुटुंबियांवर आधारवड गेल्यावर काय बिकट स्थिती ओढवते, याचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणून हर्षला गर्जे यांच्याकडे पाहता येईल. ‘वायु कुशल’ अभियानासाठी २०११ मध्ये नाशिक येथे कालबाह्य चिता हेलिकॉप्टरद्वारे सराव करीत असताना हा अपघात घडला होता. त्यात मेजर अतुल गर्जे शहीद झाले. वीरपत्नी हर्षला यांचे एका क्षणात सर्व होत्याचे नव्हते झाले. त्यावेळी मुलगी तनिष्का अवघ्या तीन महिन्यांची होती. सासरच्या मंडळींकडून आधार मिळाला नाही. उलट, सरकारी मदत पत्नीला मिळू नये म्हणून प्रयत्न झाले. अहमदनगरच्या न्यायालयात वेगवेगळे दावे दाखल करण्यात आले. घरातून बेदखल व्हावे लागल्याने हर्षला यांना लहानग्या मुलीसह मुंबईत आई-वडिलांकडे आश्रय घ्यावा लागला. माहिती तंत्रज्ञान विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या हर्षला यांची लष्करी सेवेत जाण्याची मनिषाही पूर्ण होऊ शकली नाही. न्यायालयीन तारखांसाठी मुंबईहून वारंवार नगरला खेटा घालाव्या लागल्या. या काळात त्यांनी लष्करी मुख्यालय, राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री अशा सर्वाना पत्र पाठवून नोकरी वा रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी साकडे घातले. त्याकरिता सातत्याने पाठपुरावा केला. पण, कोणाकडून प्रतिसाद मिळाला नाही. सरकारी पातळीवरील अनास्थेने हताश झालेल्या हर्षला यांच्यावर मुलगी पावणे दोन वर्षांची झाल्यावर अखेर खासगी क्षेत्रात नोकरी शोधून चरितार्थ चालविण्याची वेळ आली. पेट्रोल पंप अथवा एलपीजी गॅस वितरक नेमताना सरकार शहिदांच्या कुटुंबियांचा विचार करते. याच सुमारास वीरपत्नीची ससेहोलपट विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीपर्यंत पोहोचली. वीरपत्नी व कुटुंबियांना भेडसावणारे प्रश्न दुर्गा वाहिनीच्या महाराष्ट्र समन्वयक अॅड. मिनल वाघ-भोसले यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविले. वीरपत्नी हर्षला गर्जे यांचा जगण्याचा संघर्ष मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात गांभिर्याने लक्ष घालत पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांना पत्र लिहिले आहे. हर्षला गर्जे यांनी पेट्रोल पंप अथवा एलपीजी गॅस वितरक मिळण्यासाठी अर्ज केला आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल, उलवे या भागात त्यांच्या इच्छेनुसार पेट्रोल पंप अथवा एलपीजी वितरक केंद्र उपलब्ध करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्राधान्यक्रमाने शिफारस केली आहे. रोजगाराच्या शोधात मागील पाच वर्षांपासून चाललेल्या संघर्षांला मुख्यमंत्र्यांच्या पत्रामुळे मोठा आधार मिळाल्याची भावना हर्षला गर्जे यांनी व्यक्त केली. शासन दरबारी रखडलेला हा विषय मार्गी लावण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीने प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.