शहरासह जिल्हय़ात अनेक ठिकाणी रविवारी दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने आतापर्यंत पिकांची कोणतीही विशेष हानी केलेली नसली तरी हवामान विभागाने पुढील दोन दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास शहरात रिमझिम सरी कोसळू लागल्या. हा पाऊस अर्धा तास सुरू होता. नांदगाव येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह तब्बल दोन तास तुफानी वर्षांव झाला. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी तळे साचले होते. या पावसाने साठवून ठेवलेला कांदा, मका, कपाशी आदी शेती उत्पादनाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जेथे पिकांना पाण्याची गरज होती तेथील पिकांच्या पाण्याची एक वेळची गरज या पाण्याने भागली आहे. इगतपुरीतही एक तास जोरदार पाऊस झाला. येवाल, मालेगाव या तालुक्यांमध्ये किरकोळ सरी कोसळल्या.