जल प्रकल्पांच्या पाहणी दौऱ्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही

नाशिक : सुरगाणा तालुका सर्वाधिक पावसाचे क्षेत्र आहे. पण ते पाणी वाहत जाऊन पश्चिमेकडील समुद्रास मिळते. या ठिकाणी लघुपाटबंधारे, प्रवाही वळण योजनांची कामे जलदगतीने करून स्थानिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल. उर्वरित पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागांत वळविण्यासाठी पूर्णवेळ स्वतंत्र मुख्य अभियंता आणि संबंधित यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन लघुपाटबंधारे योजना पाहणी दौऱ्यात पाटील यांनी मार्गदर्शन के ले. या दौऱ्यात पाटील यांनी सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यातील घोडी प्रकल्प, दुमिपाडा, मांजरपाडा आणि धोंडाळपाडा या प्रस्तावित प्रकल्पांची पाहणी केली. देहरे प्रकल्पाचे भूमिपूजन आणि अंबाडा प्रकल्पाचे जलपूजनदेखील केले. पावसाचे पाणी समुद्रास जाऊन मिळत असल्याने स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलाचा प्रवास करावा लागतो.

या ठिकाणी लघुपाटबंधारेसारख्या योजना केल्या तर स्थानिकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. त्यासोबत पाण्याची उपलब्धता होऊन नळपाणी पुरवठासारख्या योजनाही या भागात सुरू करता येतील, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ या भूमिकेतून स्थानिकांची पाण्याची गरज प्राधान्याने पूर्ण करून सुरगाणा तालुक्यातील दुर्गम भागाच्या विकासासाठी लघुपाटबंधारे, प्रवाही वळण योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही महिन्यांपासून देश करोनाच्या सावटाखाली असून हळूहळू आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. लवकरच प्रलंबित असलेली विकासकामेही आता सुरू करता येतील. पाण्याचे महत्त्व स्थानिक शेतकऱ्यांना समजले असल्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांनी स्वमालकीच्या जमिनी बंधारा बांधणीसाठी देऊन मोठे योगदान दिले. ज्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनी पाणी बंधाऱ्यासाठी दिल्या आहेत त्यांचे पुनर्वसन करून जमिनीचा योग्य मोबदला त्यांना दिला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. पाणी बंधारा प्रकल्पासाठी स्वत:ची १० एकर जमीन शासनास उपलब्ध करून देणारे शेतकरी रमेश गवळी यांचा सत्कारही या वेळी करण्यात आला.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पाणी प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांचे जेवढे कौतुक आणि आभार व्यक्त करावे तेवढे कमीच असल्याचे नमूद केले. आदिवासी भागात लघुपाटबंधारे प्रकल्प सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न दूर होऊन खरीप हंगामानंतर उर्वरित आठ महिन्यांसाठी घाटमाथ्यावर  रोजगारासाठी होणारी स्थानिकांची भटकंती थांबेल. तसेच सदर प्रकल्प जलदगतीने पूर्ण होऊन आदिवासी बांधवांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल, असा विश्वाास त्यांनी व्यक्त केला.  या वेळी आमदार नितीन पवार, आमदार सुनील भुसारा, जलसंपदा विभागाचे सचिव तथा कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक टी. एन. मुंढे, मुख्य अभियंता अनंत मोरे आदी उपस्थित होते.