जळगाव : जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या जळगाव ते नंदुरबार मार्गावर अमळनेर स्थानकाजवळ गुरूवारी दुपारी कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे सात डबे इंजिनसह अचानक रूळावरून घसरले होते. या अपघातामुळे ठप्प झालेली भुसावळ-सुरत दरम्यानची दोन्ही बाजुची रेल्वे वाहतूक शुक्रवारी रात्री उशिरा सुरळीत झाली. त्यामुळे अमळनेरचे रेल्वे स्थानक पुन्हा प्रवाशांनी गजबजून गेले.

गुजरातमधील गांधीनगरजवळील जीएनसीसाठी सुरतमार्गे कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे सात डबे इंजिनसह गुरूवारी दुपारी दोन वाजता अमळनेर स्थानकाच्या पुढे रुळावरून घसरले होते. या अपघातानंतर मालगाडीच्या डब्यांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली. ओव्हरहेड वायर तसेच लोहमार्गाचे बरेच नुकसान झाले. भुसावळहून सुरतकडे होणारी दोन्ही बाजुची रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली.

परिणामी, अनेक लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या दुसऱ्या मार्गे वळविण्यात आल्या. भुसावळहून उधना-सुरत तसेच दादर दरम्यान नंदुरबारमार्गे धावणारे एक्स्प्रेस रद्द करण्यात आले. काही गाड्या सुरत-उधनाहून सुटल्यानंतर नंदुरबार-दोंडाईचा येथे थांबविण्यात आल्या. दरम्यान, शुक्रवारी सकाळी डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते सुरत दरम्यानची दोन्ही बाजुची वाहतूक एकाच रूळावरून सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच रात्री उशिरापर्यंत अप मार्गावरील मालगाडीचे अपघातग्रस्त डबे हटविण्यासह नादुरूस्त झालेले रूळ व्यवस्थित करण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण केले. परिणामी, प्रवासी गाड्यांची अप मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. दोन दिवसांपासून रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने त्रस्त प्रवाशांनी त्यामुळे सुटकेचा निःश्वास सोडला. अमळनेरजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचा अपघात नेमका कसा घडला, याची चौकशी आता पश्चिम रेल्वेकडून केली जाणार आहे.